बातमी

दीनदयाल स्पर्श योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत

कोल्हापूर, दि. 3 : टपाल खात्याकडून विद्यार्थ्यांच्या छंदाला चालना देण्यासह त्यांना इतिहासाची माहिती करून देण्यासाठी ”दीन दयाल स्पर्श योजना” योजना राबविली जात आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कोल्हापूर डाकघर विभागाचे अधीक्षक अर्जुन इंगळे यांनी केले आहे.

”दीन दयाल स्पर्श योजनेची माहिती- फिलॅटेली एक छंद म्हणून जोपासण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर ९२० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. प्रत्येक सर्कलद्वारा जास्तीत जास्त ४० विद्यार्थ्यांना ६ वी ते ९ वी च्या प्रत्येक इयत्तेतील प्रत्येकी १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

शिष्यवृत्तीची रक्कम रुपये ५०० प्रतिमाह प्रमाणे रुपये ६ हजार प्रतिवर्ष अशी असेल. विद्यार्थी मान्यताप्राप्त शाळेचा विद्यार्थी असावा व त्याला नुकत्याच झालेल्या वार्षिक परीक्षेत कमीत-कमी ६० टक्के गुण (अजा व अज. यांना ५५ टक्के) असावेत. त्या शाळेचा फिलॅटेली क्लब असावा आणि तो विद्यार्थी त्या क्लबचा सदस्य असावा. जर शाळेचा फिलॅटेली क्लब नसेल तर त्या संबंधित विद्यार्थ्याचे स्वतंत्र टपाल तिकिट संग्रह खाते असावे.

या योजनेत विद्यार्थ्यांची निवड ही फिलॅटेली प्रकल्प कार्यावरील मुल्यांकनावर किंवा सर्कल ऑफिसकडून आयोजित प्रश्न मंजुषा स्पर्धेतील कामगिरीवर केली जाईल.सर्कल स्तरावर स्थापन करण्यात आलेली समिती, ज्यामध्ये टपाल पदाधिकारी आणि प्रसिद्ध फिलॅटेलिस्ट असतील, ज्यांच्याकडून उमेदवाराने सादर केलेल्या प्रकल्पाच्या कामाचे मूल्यमापन केले जाईल. ज्या विषयावर प्रकल्प कार्य करायचे आहे त्या विषयाची सूची सर्कल ऑफिसद्वारा अधिसूचना जारी करतेवेळी जाहीर केली जाईल.निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या पालकांसोबत पोस्ट ऑफिस बचत बँक किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकचे संयुक्त खाते उघडावे लागेल. प्रत्येक पोस्टल सर्कल पारितोषिकांची निवड करेल आणि लाभार्थ्यांना शिष्यवृत्ती ची रक्कम देण्यासाठी POSB / IPPB ला सूचना देईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *