कागल /प्रतिनिधी : राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरच्या दिशेने भरघाव वेगात जाणाऱ्या अलिशान कारने महामार्ग ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला चिरडले. तानाजी शंकरराव बाबर (वय वर्षे ६०, राहणार शाहू कॉलनी, कागल) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जयसिंगराव तलाव कमानीसमोर दुपारी एकच्या वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
तानाजी बाबर हा महामार्ग ओलांडत कसता कागलहून
कोल्हापूरच्या दिशेने चाललेल्या अलिशान कारने बाबर यांना जोरात ठोकरले. तसेच पन्नास फूट फरफटत नेले. डोक्यासह
हातापायाला गंभीर मार लागल्याने बाबर यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी महामार्गावरील प्रवाशांनी मोठी गर्दी केल्याने कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
![](https://gahininathsamachar.com/wp-content/uploads/2023/11/IMG-20231120-WA0079.jpg)
अपघाताची माहिती मिळताच लक्ष्मी टेकडी येथे वाहनांची तपासणी करणाऱ्या महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
अपघातग्रस्त कार आणि अपघातातील मयत दोघेही शहरातील असल्याने घटनास्थळी दोघांच्याही मित्रांनी गर्दी केली होती. यातील काहींनी कागल नगरपालिकेची शववाहिका बोलावून बाबर यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता कागलच्या ग्रामिण रुग्णालयात नेला. यावेळी कागल पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी उपस्थित होते. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची नोंद कागल पोलिस ठाण्यात दाखल झाली नव्हती.