बातमी

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात मिलरोलर पूजन उत्साहात

नऊ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट…

कागल : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नवव्या गळीत हंगामासाठीचे मिल रोलर पूजन केले. या हंगामात एकूण नऊ लाख टन ऊस गाळपाचे कारखान्याचे उद्दिष्ट आहे असे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले

यावर्षी पाऊसमान चांगले असून कारखान्याची हंगामपूर्व कामे वेळेत करून नऊ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मागील हंगामातील २९६० रुपये मेट्रिक टन प्रमाणे संपूर्ण ऊसबिल यापूर्वीच अदा केले आहे. तोडणी वाहतुकीची बिले पूर्ण दिली आहेत. पुढील हंगामाचे तोडणी-वाहतूक ॲडव्हान्स मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत दिली जातील.

या हंगामामध्ये २३ मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पामधून आजअखेर एकूण १० कोटी, ३० लाख, ३१, ०२० युनिट निर्मिती झाली. ३ कोटी, ५ लाख, ४७,५२० युनिटचा कारखान्यामध्ये वापर झाला असून आजपर्यंत ७ कोटी, २४ लाख, ८३,५०० युनिट वीज एमएसईबीला निर्यात झाली आहे. मे महिन्याअखेरपर्यंत सहवीज प्रकल्प चालणार असून त्यामधून आठ कोटीपेक्षा जास्त युनिट वीज निर्यात करणार आहोत. तसेच, या हंगामामध्ये जुलै अखेर म्हणजेच साधारणता २८० दिवस डिस्टिलरी पूर्णपणे सुरू राहील. दरम्यान तेल कंपन्यांना एक कोटी, चार लाख लिटर इथेनॉल पुरवठा करण्याचे करार झाले असून इथेनॉल कंपन्यांना आजअखेरच्या १९० दिवसात ४२ लाख, ६८ हजार लिटर पुरवठा झाला आहे. आजपर्यंत ७१ लाख, ७५ हजार लिटर्स इतके इथेनॉल व रेक्टिफाईड स्पिरिट १३ लाख, ८५ हजार असे एकूण ८५ लाख, ६० हजार एवढे उत्पादन झाले आहे.

आंबेओहळ प्रकल्प पूर्ण झालेला आहे. तसेच, नागणवाडी प्रकल्प दृष्टिक्षेपात आला असल्यामुळे लवकरच प्रतिदिन १० हजार मेट्रिक टन गाळप क्षमता करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. ऊस उत्पादक शेतकरी सभासद व हितचिंतक यांच्या आशीर्वादावर ही गरुडभरारी मारू शकलो याचा सार्थ अभिमान आहे.

यावेळी जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे यांच्यासह अधिकारी वर्ग व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *