वृक्षारोपण, वृक्षाचा वाढदिवस, व परिसरातील डोंगर उतारावर बियांची हवाई पेरणी
मुरगूड ( शशी दरेकर ) :येथील मुरगूड शहर निसर्ग मित्र मंडळ व वनश्री रोपवाटिका मुरगूड यांचे वतीने प्रतिवर्षीप्रमाणे ५ जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘वृक्षारोपण, वृक्षाचा वाढदिवस, व परिसरातील डोंगर उतारावर बियांची हवाई पेरणी असा कार्यक्रम घेण्यात आला.
येथील वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांच्या प्रेरणेतून गेले २६ वर्ष पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने कार्यरत असणाऱ्या ‘वनश्री मोफत रोपवाटिका ‘ व ‘मुरगूड शहर निसर्ग मित्र मंडळ ‘ यांच्या वतीने प्रतिवर्षी परिसरातील डोंगरमाथ्यांवर विविध वृक्षांच्या लाखो बियांची हवाई पेरणी करण्यात येते. यावर्षीही जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दौलतवाडी – करंजिवणे दरम्यानच्या डोंगर माथ्यावर करंज, बहावा, उंबर , रिटा , सावर, सिताफळ, पळस , सिसम, कडुलिंब, आधी बियांची हवाई पेरणी करण्यात आली तर काजू फणस व करवंद या बियांची टोकण करण्यात आली परिसरातील डोंगरमाथ्या वरून पावसाळ्यापूर्वी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रतिवर्षी बियांची हवाई पेरणी करण्यात येते. यापूर्वी हवाई पेरणी केलेल्या बियांच्या पासून अनेक वृक्ष या डोंगर माथ्यावर निर्माण झालेले आहेत.
![](https://gahininathsamachar.com/wp-content/uploads/2023/06/Screenshot_20230607_112251_WhatsAppBusiness.jpg)
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी म्हणाले, पर्यावरण संवर्धन पूर्वी , आता आणि भविष्यात ही हे इतरांच्यासाठी नसून अथवा निसर्गासाठी नसून ते स्वतःला जगण्यासाठी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी पार पाडणे गरजेचे आहे . यासाठीच प्रत्येकाने वृक्षारोपण, बिजारोपण करणे गरजेचे आहे.
१६ वर्षापूर्वी लावलेल्या वृक्षांचा वाढदिवस मुरगूड नगरपरिषदेचे प्रशासक मुख्याधिकारी मा . संदीप घार्गे यांचे हस्ते केक कापून साजरा करण्यात आला . यावेळी या वृक्षाची पुजा भारतीय सेनादलातील कर्नल विनोदकुमार पाटील यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली . यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मा. संदीप घार्गे म्हणाले , पर्यावरणाचा समतोल ढासळत चालले आहे इतर शहरांच्या मानाने मुरगूड मध्ये वृक्षसंपदा निर्माण करण्यामध्ये नगरपरिषद प्रशासनासह नागरीकांचाही चांगला प्रतिसाद लाभला आहे . शहर निसर्गमित्र मंडळाच्या पर्यावरण संवर्धनाच्या कार्याचे यावेळी त्यांनी कौतुक केले .
यावेळी माजी नगरसेवक किरण गवाणकर ,बहुजन जनजागृती संस्थेचे संस्थापक एम . टी .सामंत उद्योगपती जोतिराम सुर्यवंशी, प्रा सुनिल डेळेकर , विशाल पाटील, हाजी धोंडीराम मकानदार , भैरवनाथ डवरी, अनिकेत सुर्यवंशी रमेश मुन्ने, मारुती शेट्टी , शशिकांत दरेकर, संजय घोडके, अमर कांबळे, प्रदिप वर्णे, अमर सणगर , प्रकाश पोतदार, सुनिल पाटील, सर्जेराव अवघडे , अशोक घुंगरे पाटील एकनाथ देशमुख ,अमर देवळे , रणजित निंबाळकर, विनायक रणवरे, अनिकेत सुर्यवंशी आदीसह नगर परिषदेचा कर्मचारी वर्ग व परिसरातील निसर्गप्रेमी नागरीक उपस्थित होते . याप्रसंगी अमर कांबळे यांनी उपस्थीतां कडून पर्यावरण प्रतिज्ञा म्हणून घेतली . उपस्थितांचे स्वागत प्रास्ताविक वृक्षमित्र प्रवीण सुर्यवंशी यांनी तर आभार ओंकार पोतदार यांनी मानले .
जागतिक पर्यावरण दिन उपक्रमाचा एक भाग म्हणून सायंकाळी ४ ते ६ दरम्यान निसर्ग मित्र मंडळाच्या वतिने दौलतवाडी – करंजिवणे दरम्यानच्या डोंगर माथ्यावर हजारो बियांची हवाई पेरणी व बियांची टोकण करण्यात आली .
या प्रसंगी निसर्ग मित्रमंडळाचे क्रियाशील कार्यकर्ते कै. विकास सावंत यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली .
वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी, निसर्गमित्रचे विशाल पाटील, सचिन सुतार , मृत्युंजय सुर्यवंशी, ओंकार सायेकर, सिद्धेश सुर्यवंशी, मयुरेश माने , विवेक चौगले , प्रतीक्षा सुतार (निढोरी ), यांच्यासह चौडेश्वरी हायस्कूल हळदीच्या हळदवडे येथील विद्यार्थीनी कु.गौरी आसवले,मधुरा बैलकर,कादंबरी बैलकर,श्रुतिका लाड,सपना क्षेत्री,गंगा क्षेत्री आदींनी या डोंगर माथ्यावरील बियांची हवाई पेरणी मोहिमेत सहभाग घेतला .
यावेळी श्री सुर्यवंशी यांनी उपस्थित विद्यार्थी व निसर्गमित्रच्या कार्यकर्त्यांना हवाई पेरणी व वणवा या काव्य गीतांचे गायन करून प्रोत्साहित केले .