बातमी

पाण्यावर खर्च केलेले 2 लाख पाण्यात !

सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार

सिद्धनेर्ली (प्रतिनिधी) : सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील ग्रामपंचायतीने 15 व्या वित्त अयोगातून सुमारे 2 लाखापेक्षा अधिक खर्च करून पाण्याच्या टाकीजवळ क्लोरीन डोसर व टी. सी. एल मेडिक्लेअर यंत्रणा बसवली होती.  ही यंत्रणा गेल्या वर्षभरापासून बंद असवस्थेत मोडकळीस येऊन पडली आहे. याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष करून लाखो रुपयांच्या निधीचा चुराडा केलेला आहे.

सिद्धनेर्ली गावाची लोकसंख्या पाहता कागल-मूरगुड रोडच्या लगतच गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याच्या टाक्या आहेत. या पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी शुध्द करण्यासाठी टी.सी.एल पावडरचा वापर केला जातो. ही पावडर पाण्यात मिसळून ते पाणी टाकीमध्ये सोडले जाते. ग्रामपंचायतीने आपल्या कर्मचाऱ्यांना ‘त्रास’ नको म्हणून या पाण्याच्या टाकी शेजारी 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून सुमारे 2 लाखापेक्षा जास्त निधी खर्च करून क्लोरीन डोसर व टी.सी.एल मेडिक्लेअर यंत्रणा बसवली होती. मात्र काही महिन्यातच ही यंत्रणा बंद पडली. त्यानंतर त्या यंत्रणेकडे ग्रामपंचायतीने साफ दुर्लक्ष केले आहे असे दिसून येत आहे.

सध्या गावामध्ये नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून फिल्टर हाऊसची सोय करण्यात येत आहे. मात्र अद्याप ही सुविधा उपलब्ध झाली नसताना लाखो रुपये खर्च केलेल्या या यंत्रणेकडे ग्रामपंचायतीने साफ दुर्लक्ष केलेलं दिसून येत आहे. या यंत्रणेची नेमकी गरज होती का ? आणि असेल तर ह्याकडे का लक्ष दिले जात नाही ? सदर यंत्रणा कोणी बसवली? त्यासाठी किती लोकांनी आपले टेंडर भरले?  ही यंत्रणा बसवल्यानंतर त्याची देखभाल कोण करणार? असे अनेक प्रश्न समोर येऊ लागले आहेत. लाखो रुपये खर्च करून उभारलेली यंत्रणा सध्या मात्र बंद अवस्थेत धूळ खात पडून आहे.

विकास निधीचा गैरवापर

याधीही अशा प्रकारे ग्रामपंचायतीत लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी संगनमत करून विकास कामाचा केवळ  देखावा करत विकास शासनाच्या विकास निधीचा गैरवापर केला आहे असा वारंवार आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मुळात ग्रामपंचायत सदस्य व सरपंचानी अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवायला हवा. तसेच अधिकाऱ्यांनीसुद्धा लोकप्रतिनिधींच्या गैर कारभारावर लक्ष ठेवायला हवे हे भारतीय ग्रामस्वराज्य कायद्याचे गमक आहे. पण हे दोघेच संगनमत करून शासकीय निधीचा गैरवापर करत आहेत. ग्रामपंचायतीचे अधिकारी अलिशान गाडीतून फिरत असतात. ग्रामपंचायत कार्यालयात कधीही येणे कधीही जाणे हे तर यांच्यासाठी नित्याचेच. त्यांना बांधावरील शेतकऱ्यांचे सोयरसुतक नाही. त्यांच्या समस्यात यांना स्वारस्य नाही असा आरोप ग्रामस्थ करत आहेत. कागल तालुक्यात सर्वाधिक गायरान अतिक्रणने या गावात झाली असता हे अधिकारी मात्र पेंगा काढत असतात. वरिष्ठांना ‘मॅनेज’ केले की झाले हा ‘आत्मविश्वास’ या अधिकाऱ्यांच्यात कोठून येतो हे न कळे !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *