कागल : प्रादेशिक जीवन प्राधिकरणाच्या गांधीनगर नळ पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य पाइपलाइनला कागल येथे मोठी गळती लागली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही गळती गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळापासून असूनही संबंधित प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या पाइपलाइन गळतीमुळे दररोज हजारो लिटर शुद्ध पाणी वाया जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. एका बाजूला ‘अल निनो’च्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात असताना, दुसरीकडे मुख्य पाइपलाइनच्या गळतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आले आहे.

पंचगंगा नदीकाठच्या अनेक गावांना दूधगंगा नदीपात्रातून पिण्याचे पाणी पुरवले जाते, त्यामुळे नदीवरील पाण्याचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. ‘अल निनो’चे सावट, नदीकाठच्या गावांतील नवीन योजनांना होणारा विरोध आणि भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, प्रशासनाने या गळतीची तातडीने दखल घेऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.