गुडी पाडव्याच्या सणापासून सुरू झालेल्या आंब्याच्या मोसमात वार्षिक परीक्षाचाही माहोल असायचा. कशीबशी वार्षिक परीक्षा ड्रॉईंग म्हणजेच चित्रकलेचा शेवटचा पेपर मास्तरांच्या हातात टेकवून घरी धुम ठोकली जायची. घरी बॅगा भरलेल्या असायच्या, कसेतरी पोटोबा-विठोबा करायचे आणि मामाच्या गावाला लवाजमा निघायचा.

Advertisements

        साल १९८०-९० या दशकात जरा हटके होऊन वळून पाहिले की, “झुक झुक, झुक झुक आगीणगाडी,पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया, मामाच्या गावाला जाऊया” ह्या ग. दी. माडगूळकर यांच्या बाल काव्याच्या ओळी आपोआपच मनी घोळतात. तंदूसच्या पिशवीत कोंबलेली दोन शर्ट आणि दोन चड्ड्यांची बॅग पोरांच्या हातात, सोडायला येणाऱ्याच्या हातात, मामाच्या घरात कायतरी खाऊ म्हणून रव्याचे लाडू पांढऱ्या फडक्यात गुंडाळलेले आणि चार भाकऱ्या व त्यावर आणि घरातल्या नाही तर शेजारच्या घरातल्या कोंबडीच्या अंड्याच्या,तेल मीठ टाकून भाजलेल्या पोळ्यांचा डबा.

Advertisements

         प्रत्येक गावाकडे तेव्हा रेल्वे अर्थात आगीनगाडी नव्हती त्यामुळे महामंडळाची एसटी बस हीच आगीनगाडी असायची. तीही टाईम टु टाईम लेट यायची. मामाच्या गावाला चाललोय म्हणजे काखा फुगवून एसटी स्टँडवर जाताना एकापेक्षा एक गावठी सैनिक दिसायचे,  पॅंटच्या पाठीमागे दोन मस्त ठिगळे जोडलेली असुनही इनशर्ट असायचा. सकाळी ११ ची एसटी असली तरी गडी १० वाजताच स्टॅण्डवर, जाणा-येणाऱ्या मित्रांना, मामाच्या गावाला चाललोय म्हणून सांगत बसायचा आणि हे करणार आणि ते करणार! एसटी बसला नेहमी प्रमाणे वेळ व्हायचा आणि मग मुड हिरमुसून जायचा.

Advertisements

        तेव्हा खेड्या पाड्यात कुठे प्रत्येक घरात टीव्ही होते? ज्यांच्या घरी होते तेथे ठराविक वेळी गर्दी असायची, तोच काय तो टीव्ही टाईम. मामाच्या गावाला पोहोचल्यावर स्वागत वेगवेगळ्या प्रकारचे, जसे की, मामाची बायको सुगरणं, रोज रोज पोळी शिकरणं!! मग काय, दररोज खेळणं बागडणं चालायचं. 

        सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत प्लॅन ठरवलेला. मामा,मामाची पोरं आणि ही बच्चे कंपनी…तेलाचा रिकामा प्लास्टिक डबा, इन्नर आणि दोरी घेऊन विहीरीवर, नाही तर नदी काठी. ठो ठो आवाज ऐकतच, पाण्यात ढकलून दिले जायचे, यात दोन एक तास निघून जायचे.

घरी, भाकरी आणि भाजी चोपुन खायची आणि घराबाहेर रस्त्यावर चिन्नी दांडु (विटीदांडू)चा खेळ रंगायचा, हमखास भांडण, चार खायचं आणि चार द्यायचं पण घरात नाही सांगायचं. मामाचा पत्र हरवलं,ते मला सापडलंचा खेळ रंगायचा, लगोरी खेळता खेळता पाठीत चिंध्याचा बाॅल रापकन बसायचा.

        दुपारी झोपणे हा प्रकारच नाही,मग क्रिकेट खेळायचे किंवा क्रिकेट बघायला जायचे. भर उन्हात शेतात जाऊन आंब्याच्या झाडावर चढून कच्च्या कैऱ्या तोडायच्या आणि खिशात पेपरात गुंडाळून आणलेल्या चटणी मिठाबरोबर दात आंबस्तोवर खायचं. जांभूळ, करवंद, रान बोरं इ. सवडीप्रमाणे चाखायची. वेळ प्रसंगी पत्त्यांचे तीन पाच आठ, गाढव, हुकुम असे डाव रंगवायचे आणि वेळ कधी निघून गेला याचे भानच रहायचे नाही.

      गावाकडे याच काळात म्हाई, लक्ष्मीची यात्रा भरायच्या आणि त्या साठी मग विविधांगी कार्यक्रम असायचे. जत्रेसाठी ओपन थिएटर मध्ये सिनेमा असायचा ज्याचा गाजावाजा आठ दिवस अगोदरच लाऊड स्पीकर वरून व्हायचा. लाऊड स्पीकरचा कर्णा असा काही फिट्ट केलेला असायचा की, एका गावातुन आजुबाजूच्या दोन तीन गावात ऐकु जायचे. मस्त मराठी गाणी लावली जायची की ज्या मध्ये, गीतकार मुरलीधर गोडे यांचे बन्या बापू चित्रपट मधील शैलेंद्र सिंग व उषा मंगेशकर यांनी गायलेले “ प्रीतीचं झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजुळ गाणी, रोमांच सर्वांगी, गेले मी न्हाऊनी,रोमांच सर्वांगी, गेले मी न्हाऊनी” आणि तुमचं आमचं जमलं या चित्रपटातलं, कै. दादा कोंडके अभिनयीत चंदनाच्या पाटावर,सोन्याच्या ताटामंदी,मोत्याचा घास तुला भरवितेरे, राया….. अशा सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी गुणगुणायला व्हायच्याच. मधुनच माईकवर बोलणारा एखादा माय का लाल बोलायचा.. दिनांक १० रोजी रात्रो ठिक १० वाजता , हायस्कूल शाळेच्या पटांगणावर…….हा पिक्चर दाखविण्यात येणार आहे, तिकीट दर ल्हानासाठी दोन रुपये आणि मोठ्यांसाठी ५ रुपये, याल तर हसाल न याल तर फसाल…लगेच चंदनाच्या पाटावर…..सुरु व्हायचे. एक वेगळाच म्हाहोल असायचा.

          दुपारच्या वेळी बुट्टीतुन काजु विकायला यायचे, झोप मोड करुन पैसै घ्यायचे, काजु मग लाल पिवळ्या रंगाचे शोधून घ्यायचे, कापून मीठ घालून घ्यायचे आणि हमखास त्याचा न जाणारा डाग कपड्यावर पडायचा. मग गारेगारवाला पोंपों वाजवत नाही तर घंटी वाजवत हजर असायचा. गारेगार वाल्यांच्या पत्र्याच्या डब्याच्या कोपऱ्यातनं गळणाऱ्या लाल भडक गारेगारचे गोड पाणी पुन्हा चोखलेल्या गारेगारवर घेण्यात औरच मजा असायची.

       मधुनच ५० पैशाला तासभर सायकल भाड्याने घेऊन एक राऊंड एक राऊंड करत , तास केंव्हाच संपायचा. जुन्या सायकलच्या रिमा, सळ्यांची केलेली गाडी फिरवण्यात जी मजा असायची ती कशातच नसायची. गोट्यांनी खेळणे असो वा काचा कवड्या असो किंवा दडुनमडुन म्हणजे लपाछपी यात दिवस अन् दिवस  संपायचे. रात्री अंगणात नैसर्गिक एअर कंडीशन मध्ये वाकळा घेऊन आकाशात चांदण्याचा खेळ बघत बघत डोळे कधी मिटायचे आणि सकाळच्या उन्हाची कोवळी किरणं डोळ्यात प्रवेश करताना उठायचं असं करत करत सुट्ट्यांची सुट्टी कधी निघून गेली हे कळतच नव्हते. परतीचा मार्ग, मामानं, टेलरकडुन शिवुन घेतलेला शरट आणि चड्डी हारकुन घालायचा आणि एसटीनं गावाकडं स्वारी पोहोच.

   आताच्या काळात, मोबाईल, टीव्ही व्हीडिओ गेम, व्हाटस् अप, चॅट जीपीटी, ट्युशन, समर कॅम्प यामध्ये मामाही हरवलाय आणि मामाचं गावही…ना मामाचं पत्र हरवलंय ना झुक झुक आगीणगाडी ‌‌…. फक्त शिल्लक राहिली आहेत ती नावाची नाती…..

   ॲड संजय डिक्रुझ कोल्हापूर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!