कागल / प्रतिनिधी : जून महिन्याची 15 तारीख उलटली तरी अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने खरीप हंगामाच्या तयारीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हवामानातील बदलामुळे पावसाचे आगमन उशिरा होणे, कमी प्रमाणात पाऊस पडणे किंवा पावसात मोठे खंड पडण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे कागल तालुक्यासह सीमाभागातील शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

भात, सोयाबीन, मका, भुईमूग तसेच विविध भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. या पिकांसाठी वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात पाऊस आवश्यक असतो. मात्र यावेळी मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने शेतकरी पेरणीबाबत सावध भूमिका घेत आहेत.
शेतकऱ्यांनी शेताची मशागत व बियाण्यांची खरेदी पूर्ण केली असली तरी बऱ्याच ठिकाणी पावसाअभावी पेरणीचा मुहूर्त लांबणीवर पडत आहे.
अनेक शेतकऱ्यांनी शेताची मशागत आणि बियाण्यांची तयारी करुन ठेवली आहे. मात्र पावसाचा ठावठिकाणा नसल्याने पेरणीबाबत संभ्रम आहे. वेळेवर पाऊस न झाल्यास खरीप हंगाम अडचणीत येण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.