‘श्री स्वामी समर्थ दूध संस्थे’चा सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा पवित्रा; अवमानाचा दावा करणार
कोल्हापूर: गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक ९० दिवसांच्या आत घेण्याचे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असतानाही, या निकालाचा चुकीचा अर्थ लावून समाजात संभ्रम पसरवणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि वकिलांवर कडक कारवाई करण्याची मागणी पुंगाव (ता. राधानगरी) येथील श्री स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेने केली आहे.
संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की, राज्य निवडणूक प्राधिकरणाचे अधिकारी अशोक गाडे आणि दुग्ध उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी निकालाचा चुकीचा अर्थ लावून न्यायालयाचा अवमान केला आहे. राजकुमार पाटील हे सुनावणीवेळी न्यायालयात उपस्थित असूनही त्यांनी वस्तुस्थिती विपर्यस्त स्वरूपात मांडली, असा आरोप संस्थेने केला आहे. याशिवाय, ॲड. सतीश तळेकर यांनीही निकालाची चुकीची माहिती पसरवल्याने त्यांची सनद रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली जाणार आहे.

न्यायालयाने ६ मे पासून ९० दिवसांच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाही केवळ वेळकाढूपणा करण्यासाठी निकालाचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. या अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावे आणि वकिलांवर कडक कारवाई करावी, यासाठी संस्था आता कायदेशीर लढा देणार आहे.