बातमी

कणेरी मठावर होणाऱ्या महोत्सवात रोल मॉडेल, प्रेरणादायी आणि दिग्गजांचीही राहणार उपस्थिती

कोल्हापूर : पर्यावरण, शेती, अध्यात्म, सामाजिक, आर्थिक, राजकीय, उद्योग, शिक्षण, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक यासह सर्व क्षेत्रांतील रोल मॉडेल, प्रेरणादायी आणि दिग्गज व्यक्तींची सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात उपस्थिती असणार आहे. अनेकांच्या संघर्षमय आणि यशस्वी वाटचालीची कहानी या लोकोत्सवात उलघडणार आहे. यामुळे नव्या वाटचालीसाठी आशेची नवी किरणे यातून मिळणार आहेत.

लोकोत्सव देणार आशेची नवी किरणे, नव्या जीवनशैलीचा हुंकार

२० ते २६ फेब्रुवारी दरम्यान सिद्धगिरी कणेरी मठावर होणाऱ्या महोत्सवात पर्यावरण जागृती, व्यापार उद्योगाची वृध्दी, सेंद्रिय शेतीचा प्रसार यासह नव्या पिढीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी रोज दोन सत्रात अनेक मान्यवरांचा मुक्त संवाद होणार आहे.

सेंद्रिय शेती कशी करावी, नवनवे स्टार्ट अप कोणते आहेत, व्यवसाय सुरू करताना काय काळजी घ्यावी, पर्यावरणपूरक उद्योग कोणते आहेत, आधुनिक पद्धतीने शेती, उद्योग आणि व्यवसाय करत उत्पादन खर्च कमी कसा करावा, आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी कोणती जीवनशैली स्वीकारावी, आरोग्यसंपन्न कसे रहावे यासह अनेक गोष्टींचे मार्गदर्शन येथे केले जाणार आहे. प्रेरणादायी व्यक्तीनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावावी, त्याचा उपस्थितांना लाभ व्हावा यासाठी पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी अधिक प्रयत्न करत आहेत. देशभरातील अशा व्यक्तींशी त्यांनी संपर्क साधून निमंत्रित केले आहे.

या लोकोत्सवात हजारावर साधुसंताचा सहवास लाभणार आहे. यातून विज्ञान आणि अध्यात्माची सांगड कशी घातली जाईल याची माहिती मिळेल. पाचशे कुलगुरू शिक्षण क्षेत्रातील नव्या संशोधनावर प्रकाश टाकतील. दहा हजारावर उद्योजक आपल्या यशस्वी वाटचालीचा लेखाजोखा मांडतील. चार हजारावर वैदू औषधी वनस्पतींची माहिती देतील. जगभरातून येणारे परदेशी पाहुणेही प्रगतीचा मार्ग दाखविणार आहेत.

या महोत्सवासाठी पाणी तज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा, बाबा सिचेवाल, संजयसिंह सज्जन, ५८ गावातील दुष्काळ हटविणारे लक्ष्मण सिंह, पर्यटनवाढीत महत्त्वाची भूमिका बजावणारे कानसिंह निर्वाण, शंभर एकरमध्ये सेंद्रिय शेती करणारे किसनसिंह जाखड, देशातील सुप्रसिद्ध उद्योजक श्रीधर व्यंभू, हणमंतराव गायकवाड, पोपटराव पवार, विजय संकेश्वर, मिलेटमॅन डॉ. कादर, स्वामी त्याग वल्लभ दासी, माधवप्रिय दासजी, केंद्रिय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, मंत्री अनुराग ठाकूर, संशोधक गुरूराज करजगी, खासदार अमोल कोल्हे, तेजस्वी सूर्या, अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गजांचे अनुभव येथे ऐकायला मिळणार आहेत.

याबाबत श्री क्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठाचे विश्वस्त उदय सामंत यांनी सांगितले की, देशात विविध क्षेत्रात कार्यरत असलेले अतिशय दिग्गज या लोकोत्सवात सहभागी होणार असल्याने त्याचा मोठा फायदा स्थानिक आणि सहभागी लोकांना होणार आहे.

अध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक, उद्योग, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक, शेती, अर्थकारण यासह सर्व क्षेत्रातील रोल मॉडेल, मान्यवर आणि दिग्गज व्यक्ती या लोकोत्सवात सहभागी होणार आहेत, त्यांच्या अनुभवाचा, संघर्षमय आणि प्रेरणादायी वाटचालीची माहिती मिळणार आहे, यामुळे हा लोकोत्सव नव्या पिढीला निश्चितपणे आशेची नवी किरणे देईल.                                                                                                                                                       
                                                                                संतोष पाटील, विश्वस्त श्रीक्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ

७ दिवस रंगणार लोकोत्सव
२८ राज्यांचा असणार समावेश
५० देशांतून येणार परदेशी पाहुणे
३०० जिल्ह्यातील संस्था, प्रतिनिधींचा सहभाग
५०० कुलगुरूंची राहणार उपस्थिती
६५० एकरात लोकोत्सव
१००० देशभरातील साधूसंतांचा लाभणार सहवास
४००० वैंदूंचे होणार संमेलन
१०,००० व्यवसायिकांचे संमेलन आणि अनुभव कथन
तीस लाख लोकांचा सहभाग अपेक्षित
एक लाख स्व्केअर फुट जागेत मुख्य मंडप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *