बातमी

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंदी आदेश लागू

आदेश दिनांक ०९ / १२ / २०२२ रोजी सकाळी ०७.०० वा. पासून ते दिनांक २३/१२/२०२२ रोजी रात्री २४.०० वा. पर्यंत अंमलात राहील.

कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील कर्नाटकच्या हद्दीत कन्नड वेदीका संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील वाहनांना लक्ष्य करुन नुकसान करणेत आले आहे. त्या पार्श्वभुमीवर कोल्हापूर जिल्हयातील काही पक्ष/संघटना यांचेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटून महाराष्ट्र राज्यात व्यवसाय करणारे व रहिवासी असलेल्या कन्नड भाषीकांना लक्ष्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या तणावपूर्ण वातावरणात कोल्हापूर जिल्हा बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.

शनिवारी दिनांक १० / १२ / २०२२ रोजी कर्नाटक सरकार विरोधात महाविकास आघाडीकडून तीव्र आंदोलन करणेत येणार असून या आंदोलनासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना आमंत्रित केले आहे. महाविकास आघाडी तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते हे दिनांक १० / १२ / २०२२ रोजी राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळ कोल्हापूर येथे एकत्रित जमून निषेध व्यक्त करणार आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक सिमावाद न मिटलेस कोल्हापूरसह महाराष्ट्र बंद देखील करण्यात येईल असा इशारा महाविकास आघाडीने दिला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात अनपेक्षित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कारणांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणेकरिता, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर, यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ (The Maharashtra Police Act, 1951) चे कलम ३७ (१) अ ते फ आणि कलम ३७ (३) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंदी आदेश जारी केला आहे.

कलम ३७ (१) अ ते फ :-

अ) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदूका, सुऱ्या, काठया किंवा लाठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे. (ब) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे. (क) दगड किंवा इतर क्षेत्रणात्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. (ड) व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन. (इ) जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे. (फ) ज्यामुळे सभ्यता अथवा नितिमत्ता यास धक्का पोहोचेल अशा किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपुर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्यांचा जनतेत प्रसार करणे.

कलम ३७ (३) :-

कोल्हापूर जिल्हयामध्ये पाच अगर पाचहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव जमविणे, मिरवणूका काढणे व सभा घेणे.
हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी/कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजाविणेचे संदर्भात तसेच निवडणूकीचे कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात, आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना, तसेच सर्व जातीधर्माचे सण / उत्सव / यात्रा, इ. हे शांततामय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, जयंती / इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना लागू असणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *