कोल्हापूर- केडीसीसी बँकेच्या केंद्र कार्यालयात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ अनुदानाच्या मंजुरीपत्रांचे वाटप करताना आमदार पी. एन. पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, संचालक व अधिकारी.

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना -२०१९ पहिल्या टप्प्यात एक लाख, १३ हजार शेतकऱ्यांना मिळाले ४०९ कोटी प्रोत्साहनपर लाभ अनुदान

कोल्हापूर, दि.२० : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना- २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ अनुदानाच्या मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले. बँकेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. जिल्हा बँकेशी सलग्न असलेल्या एकूण तीन लाख, एक हजार, २८० शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात एक लाख, १३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर ४०९ कोटी प्रोत्साहनपर लाभ अनुदान जमा झाले आहे.

Advertisements

याबाबत अधिक माहिती अशी, याआधीच्या महाविकास आघाडी सरकारने थकीत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ आणली होती. यामध्ये जिल्हा बँकेशी संलग्न एकूण ३१,१३८ शेतकऱ्यांना १५७ कोटी रुपये कर्जमुक्ती मिळाली होती. त्याचवेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नियमितपणे कर्जफेड करणा-या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ अनुदान देण्याचे घोषित केले होते. दरम्यान; कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे ते देता आले नव्हते.

Advertisements

आमदार पी. एन. पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्यावतीने शेतकऱ्यांना हे प्रोत्साहनपर लाभ अनुदान जाहीर केले होते. अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्पीय भाषण करताना अजितदादा पवार यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी म्हणजेच एक जुलै २०२२ रोजी कृषी दिनाच्या औचित्यावर हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याची घोषणा करून तेवढ्या रक्कमेची पुरवणी मागणीही मंजूर करून घेतली होती. दरम्यान; ३० जून २०२२ रोजी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यामुळे हे अनुदान देता आले नव्हते. त्याच पुरवणी मागणीचे पैसे आता या शासनाकडून दिले जात आहेत.

Advertisements

संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, महाराष्ट्रात शिंदे- फडणवीस सरकार येऊन चार महिने झाले आहेत. हे अनुदान आज वाटप होत असल्याबद्दल या सरकारचे स्वागतच आहे. आलेले हे अनुदान ५० टक्केच शेतकऱ्यांना दिले आहे. उर्वरित ५० टक्के शेतकऱ्यांनाही तात्काळ अनुदान मिळाल्याशिवाय त्यांचीही दिवाळी गोड होणार नाही. त्यामुळे, त्यांच्या खात्यावरही दिवाळीपूर्वी तात्काळ पैसे जमा व्हावेत, ही नम्र विनंती.

यावेळी बँकेचे संचालक आमदार पी. एन. पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, सौ. श्रुतिका काटकर आदी संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी योजनेविषयी सविस्तर माहिती दिली.
……………

AD1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!