आळंदी : आषाढी वारी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी सज्ज असलेल्या आळंदी शहरात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत.
या परिस्थितीमुळे सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नाही, असे आळंदी नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे. जे वारकरी आणि भाविक आधीच आळंदीच्या दिशेने प्रवासाला निघाले आहेत, त्यांनी आहेत त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावे आणि आळंदीत येण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले आहे.

प्रशासनाकडून नागरिकांना खालील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
नदीपात्र, घाट परिसर आणि बंद करण्यात आलेल्या पुलांकडे जाणे टाळावे.
प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना करत असून, सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, अशी नम्र विनंती नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.