पिंपळगाव खुर्द : सिद्धनेर्ली परिसरातील शेतकऱ्यांनी शेती पंपांच्या विजेच्या लपंडावामुळे आणि बिलावरील अश्वशक्तीच्या (HP) चुकीच्या नोंदींमुळे आक्रमक पवित्रा घेतला आहे. कॉ. शिवाजी मगदूम यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महावितरणचे सहाय्यक अभियंता सागर कांबळे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
काय आहेत मुख्य मागण्या ?
१. अखंडित वीज पुरवठा: पिकांना पाण्याची गरज असताना फिडर खराब होणे किंवा ओव्हरलोडिंगमुळे वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांना सलग १२ तास वीज मिळावी आणि तांत्रिक बिघाडामुळे वीज गेल्यास तेवढाच वेळ वाढवून मिळावा.

२. अश्वशक्तीची (HP) दुरुस्ती: ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज’ योजनेचा लाभ ७.५ HP पर्यंतच्या पंपांना आहे. मात्र, प्रत्यक्षात ३ किंवा ५ HP चे पंप असताना कागदपत्रांवर १० ते १२.५ HP अशी चुकीची नोंद असल्याने अनेक शेतकरी योजनेपासून वंचित आहेत. ही चूक तत्काळ सुधारावी.
३. मीटर बदलणे: बंद असलेली शेती पंपांची मीटर्स त्वरित बदलण्यात यावीत.
सहाय्यक अभियंता सागर कांबळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, खंडित वीज पुरवठ्याचा वेळ वाढवून देण्याचे आणि HP च्या नोंदी दुरुस्त करून मोफत वीज योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.