बातमी

वंदूरच्या सरपंचपदी दिपाली उत्तम कांबळे यांची निवड

कागल (विक्रांत कोरे) : वंदूर ता. कागल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपाली उत्तम कांबळे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सिध्दनेर्ली विभागाचे मंडल अधिकारी विकास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून दिपाली उत्तम कांबळे आणि भाजप जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे गटाकडून राजनंदिनी जोंधळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार दिपाली उत्तम कांबळे यांना ९मते, तर राजनंदिनी जोंधळे यांना २ मते मिळाली.

निवडणूक निर्णय अधिकारी विकास जाधव यांनी दिपाली कांबळे यांची सरपंच म्हणून निवड झाल्याचे घोषित केले. नवनिर्वाचित सरपंच म्हणून निवड झाल्यानंतर वंदूर ग्रामपंचायतीच्या मावळत्या सरपंच सौ. सविता हिरेमठ यांच्या हस्ते नूतन सरपंच दिपाली कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. सरपंचपद सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी राखीव असताना मागासवर्गीय महिलेला सरपंच पदाचा सन्मान देण्यात आला हे या निवडणुकीचे विशेष.

निवडीनंतर महाविकास आघाडीच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत गावातून जल्लोषी मिरवणूक काढली. यावेळी झालेल्या सभेत बोलताना नूतन सरपंच सौ. दिपाली कांबळे यांनी आमदार हसन मुश्रीफ आणि माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या प्रयत्नातून सुरू असलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्राधान्य राहील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उद्यान सुशोभीकरण करणार असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. निवडी प्रसंगी कागल तालुका संजय गांधी निराधार समितीचे माजी अध्यक्ष धनराज घाटगे, राष्ट्रवादीचे गटनेते बबन खोडवे, उपसरपंच दिपाली रणदिवे, सागर बागणे, उत्तम कांबळे, बाबुराव हंचनाळे, रामचंद्र लोकरे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *