मुंबई, दि. २३: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ऑनलाइन अर्ज प्रणालीत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. यापुढे कोणताही अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व उमेदवारांना ‘केवायसी’ (Know Your Customer) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल.
MPSC ने दिलेल्या माहितीनुसार, आधार आधारित ऑनलाइन, ऑफलाइन डिजिटल, ऑफलाइन पेपर आधारित किंवा नॉन-आधार ऑफलाइन या चारपैकी कोणत्याही एका पद्धतीने उमेदवारांना आपली ओळख पडताळून घ्यावी लागेल.

या निर्णयामुळे उमेदवारांची ओळख अचूकपणे सत्यापित करता येणार असून, फसवणूक आणि चुकीच्या माहितीला आळा घालणे शक्य होईल. नोंदणी करताना मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी देणेही आवश्यक आहे.
आधार आधारित पडताळणीसाठी आधार क्रमांकाशी संलग्न मोबाईल नंबर असणे बंधनकारक आहे. एमपीएससीला आता भरती प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षांच्या विविध टप्प्यांवर आधार प्रमाणीकरण वापरण्याची अधिकृत मान्यता मिळाली आहे.