बातमी

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांमुळेच कोल्हापूरची ओळख जगभर

राजर्षी शाहू महाराजांना आमदार हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन

कागल, दि.२६ (विक्रांत कोरे): राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळेच कोल्हापूरची ओळख आणि लौकिक सबंध जगभर पोहोचलेला आहे, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. राजर्षी शाहू महाराज यांच्या विचार आणि कृतीचे आचरण केल्यास स्वतःसह लोकजीवनही समृद्ध बनेल, असेही श्री मुश्रीफ म्हणाले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर मधील उद्यानातील छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्यांना आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. या महात्म्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

यावेळी अजित कांबळे, विवेक लोटे, रोहित पाटील, भगवान कांबळे, संजय चितारी, गणेश कांबळे, संजय ठाणेकर, अस्लम मुजावर, नवाज मुश्रीफ, बच्चन कांबळे, इरफान मुजावर, गणेश सोनुले, सचिन नलवडे, अमोल डोईफोडे, तुषार भास्कर, दिपक कांबळे, विष्णूपंत कुंभार, युवराज लोहार, बाबासाहेब काझी, अमन नाईक, अमोल सोनुले, मेघा वाघमारे, मंगेश पिष्टे, शहानूर पखाली, सचिन नाईक, संदीप भुरले, प्रकाश वाघमारे आदी प्रमुखांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समतेचा विचार दिला. आरक्षणाचा कायदा, सक्तीचे प्राथमिक शिक्षण करणारे दूरदृष्टीचे लोककल्याणकारी राजे होते. त्यांनी कोल्हापुरात स्थापन केलेल्या सर्वधर्मीयांच्या वस्तीगृहांवरूनच त्यांची सर्वधर्मीयांबद्दलची भावना प्रतिबिंबित होते. कृषी क्षेत्रासह उद्योगाला, कला -संस्कृतीला व क्रीडा क्षेत्राला सातत्याने चालना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *