समाजवादी प्रबोधिनी मुरगुडच्या डॉ. आंबेडकर व्याख्यानमालेचा समारोप
मुरगूड ( शशी दरेकर ) : “तीर्थक्षेत्र पंचतारांकित आणि प्राथमिक शाळा भिकार” अशी अवस्था समाजाचे अधःपतन होत आहे हा इशारा देणारी शेवटची घंटा असते. परिस्थिती भयावह होण्यापूर्वी मानवी जीवन वाचवण्यासाठी शिक्षण व्यवस्था वाचली तर माणूस वाचेल माणूस वाचला तर समाज वाचेल आणि समाज वाचला तर देश आणि जग वाचेल”
असा इशारा प्राचार्य डॉक्टर अर्जुन कुंभार यांनी दिला.
समाजवादी प्रबोधिनी मुरगुड ता.कागल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेचे समारोपाचे पुष्प गुंफताना ते बोलत होते. “भारतीय राज्यघटना आणि सध्याची बहुजन समाजाची शैक्षणिक वाताहत” या विषयाची त्यांनी मांडणी केली. अध्यक्षस्थानी समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी होते.

डॉ. आंबेडकर यांनी जगातील उदात्त तत्व स्वातंत्र्य,समता आणि बंधुता तसेच प्रत्येक नागरिकांच्या कल्याणाची खात्री देणारे बहुमोल मानवी तत्व संविधानातून साकारले. वैविध्यपूर्ण देश आणि शोषणाची परंपरा असणाऱ्या भारतातील मानवी समाजाला सामाजिक न्यायाचा संस्कार देण्यासाठी कल्पकतेने विचार करणारी हीच राज्यघटना नावाची संहिता आहे.”
ते म्हणाले,”मातृभाषेच्या शाळा बंद होणे, शिक्षणाच्या भांडवलीकरणातून सरकारी शाळा बकाल होणे हे अधोगतीचे लक्षण आहे.

सरकारी शाळा नावाची गोरगरिबांना तळागाळातील मुलांना मोफत राष्ट्रीय शिक्षण देणारी व्यवस्था बंद पडणे म्हणजे या भारतात जातीव्यवस्थेची पुनर्स्थापना होणे. कंपनी ॲक्ट प्रमाणे नवरा बायको किंवा एखादे कुटुंब शाळा काढून चालवत असेल,व शाळेत समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व नसेल तर समाजातील जाती आणि वर्ग विषमतेचे प्रतिबिंब शिक्षणामध्ये उमटणारच. हीच भीती हंटर आयोगासमोर शिक्षणाच्या खासगीकरणाच्या विरोधात साक्ष देताना महात्मा फुले यांनी व्यक्त केली होती. आज त्यांचे शब्द खरे होण्याची भीती उभी राहिली आहे.”
अध्यक्षीय भाषणात प्रसाद कुलकर्णी म्हणाले “राज्यघटना हे डॉ. आंबेडकर या द्रष्ट्या सुधारकाने तयार केलेली मानवतावादी रचना म्हणजे राज्यघटना. पण यातील मूल्य राबवण्यासाठी जनतेने राज्यकर्त्यांना भाग पाडावे लागते किंवा ते भ्रष्ट असतील तर राज्यकर्त्यांची नवी फळी उभी करावी लागते.”
स्वागत बी.एस.खामकर, प्रास्ताविक समीर कटके, सूत्रसंचालन अमर कांबळे तर आभार अध्यक्ष बबन बारदेस्कर यांनी मानले.
दलीत मित्र डी.डी.चौगले,पी.डी.मगदूम, एस. आर.बाईत, एम.टी. सामंत, सुनील भोई, चिदंबर एकल, बळीराम डेळेकर, महादेव वागवेकर, दिलीप कांबळे,महादेव भोई ,अशोक मधाळे, रामचंद्र रनवरे, सुनील रणवरे, मारुती कांबळे, आर.पी.पाटील
उपस्थित होते.