व्हनाळी : केनवडे ता. कागल येथे उभारलेला श्री अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्स लिमिटेड हा कारखाना कार्यकर्त्यांना स्वास्थ देण्यासाठीच माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी स्वतःची मालमत्ता तारण देऊन आम्हा कार्यकर्त्यांचे हित जोपासण्यासाठी उभा केला आहे. संजयबाबा घाटगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना नेहमी स्वतःचा श्वास समजून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे.
आज अन्नपुर्णा कारखान्यासाठी कर्ज घेतले म्हणून केडीसीसी बॅंकेला दंड होत असेल आणि दंडाची रक्कम जरी संजयबाबा घाटगे स्वताः भरणार असतील तर,आम्ही कार्यकर्ते स्वतःहून पुढे येऊन वर्गनी काढून हा दंड उद्या सोमवार दि. २७ रोजी बँकेत भरणार असल्याचे कार्यकर्त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.

रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या नियमानुसार जिल्हा बँकेच्या संचालकांना त्यांच्या फर्म किंवा कंपन्यांना अर्थपुरवठा करता येत नाही. नाबार्डच्या तपासणीमध्ये बँकेचे तज्ञ संचालक संजयबाबा घाटगे यांच्या अन्नपूर्णा साखर कारखान्याला कर्जपुरवठा केल्याबद्दल आक्षेप घेतला व तेरा लाख तीस हजार रुपयांचा दंड केला.
हा दंड स्वतः भरण्याची घोषणा माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केली या पार्श्वभूमीवर केनवडे ता.कागल येथे श्री अन्नपुर्णा कारखाना कार्यस्थळावर कार्यकर्त्यांनी बैठक आयोजित केली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संचालक एम. बी. पाटील होते.
या बैठकीत केडीसीसी बॅंकेला झालेला दंड संजयबाबा घाटगे गटाचे कार्यकर्ते स्वतः वर्गणी काढून भरण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
यावेळी के.के.पाटील म्हणाले, अन्नपुर्णा कारखाना उभारणी वेळी माजी आमदार संजयबाबा घाटगे हे जिल्हा बँकेत संचालक नव्हते. कारखाना उभारण्यासाठी जिल्हा बँकेतून 18 जून 2019 ला कर्ज घेण्यात आले आणि कर्ज घेतल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी संजयबाबा घाटगे यांची जिल्हा बँकेत तज्ञ संचालक म्हणून निवड झाली. याशिवाय नाबार्डच्या आक्षेपानंतर संजयबाबा घाटगे यांनी 30 मार्च 2026 रोजी कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देखील दिला आहे. त्यामुळे तसा नियमाने अशा पद्धतीच्या दंडाला सामोरे जाण्याची गरज नाही परंतु सरकारी नियमाप्रमाणे झालेली गोष्ट स्वीकारून आमचे नेते संजयबाबा घाटगे यांनी केडीसीसी बॅंकेला झालेला दंड स्वतः भरतो असे जरी सांगितले असले तरी आम्ही कार्यकर्तेच यासाठी एकत्र येऊन ही दंडाची रक्कम वर्गणी काढून भरणार आहोत.
ए.वाय.पाटील म्हाकवेकर म्हणाले, श्री अन्नपूर्णा शुगर कारखाना ही आमची अस्मिता व मंदीर आहे. हे उभा करण्यासाठी आमचे नेते संजयबाबा घाटगे यांनी रात्रंदिवस हाडाची काड आणि रक्ताचे पाणी केलं आहे. केवळ त्यांच्या स्वार्थासाठी नव्हे तर कार्यकर्त्यांना स्वास्थ्य आणि न्याय देण्यासाठीच कारखाना उभारला आहे. त्यामुळे ही जिल्हा बॅंकेच्या दंडाची रक्कम जरी संजयबाबा घाटगे भरतो म्हणत असले तरी हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे.
यावेळी दिनकर दौलू पाटील, जिल्हा परिषद सदस्य काकासाहेब सावडकर,विश्वास दिंडोर्ले, राजू भराडे, मल्हारी पाटील, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय दंडवते, मनिषा विलास पाटील,सुनिता माळी, दतात्रय पाटील, ज्ञानदेव पाटील,संभाजी भोसले, रणजित गायकवाड,धोंडिराम एकशिंगे,शहाजी तांबेकर आदी मान्यवर उपस्थित होते. रणजित मुडूकशिवाले यांनी स्वागत केले,तानाजी पाटील यांनी आभार मानले.