कागल : सध्या शेतीमध्ये प्लास्टिक आच्छादनाचा वापर वाढला आहे. जमिनीचे तापमान समतोल ठेवण्यासाठी तसेच तिच्यातील आर्द्रता टिकून राहावी म्हणून शेतकऱ्यांकडून प्लास्टिक आच्छादनाचा वापर केला जातो पण याच प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण जमिनीत मिसळल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे दिसून आले आहे.
पाच मिलिमीटर पेक्षाही कमी व्यास असणाऱ्या प्लास्टिकचे सूक्ष्मकणामुळे जमिनीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे दिसून आले आहे. ‘टॉक्सिक लिंक’ नावाच्या स्वयंसेवी संस्थेने कर्नाटक व महाराष्ट्रातील काही भागातील जमिनीची पाहणी केली असता त्यातून ही धक्कादायक बाब उघड झाली.
या गोळा केलेल्या नमुन्यांची संशोधकानी मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन येथे तपासणी केली असता त्यातील बहुतांश नमुन्यामध्ये प्लास्टिकचा अंश आढळून आला आहे. महाराष्ट्रात ज्या ठिकाणी अशी आच्छादन वापरून फेकून दिली जातात या ठिकाणावर मातीमध्ये प्लास्टिकचे प्रमाणे एक किलो मृदे मागे ८७.५७ इतके असल्याचे दिसून आले आहे.
हे प्रमाण जवळपास दुप्पट असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. बऱ्याचदा शेतकरी या आच्छादनाचा उपयोग संपल्यानंतर ते शेताच्या कडेला अथवा खड्ड्यामध्ये टाकून देतात त्यामुळे प्रदूषण होत असल्याचे आढळून आले आहे. ज्या ठिकाणच्या शेतीमध्ये अशा आच्छादनाचा वापर केला जात नाही तेथील माती मध्ये प्लास्टिक कणांचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले आहे. महाराष्ट्रातील आर्नुल येथे 15 सेंटिमीटर खोलीवर प्लास्टिक कणांचे प्रति एक किलो मातीमध्ये प्रमाण हे 20.54 एवढे आहे.
सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज
प्लास्टिक कण हे जमिनीमध्ये मिसळल्याने त्याचा मानवी आरोग्य व कृषी उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. बऱ्याचदा शेतकरी हे प्लास्टिकचे आच्छादन फेकून देतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमीन व पाण्याचे प्रदूषण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीला फाटा देत सेंद्रिय शेतीकडे वळायला हवे, असे प्रतिपादन ‘टॉक्सिक लिंक’ च्या मुख्य कार्यक्रम समन्वयक प्रीती बांठिया यांनी केले.