बातमी

व्यापाऱ्यांवर अन्याय होवू न देता श्री अंबाबाई मंदिर परिसरातील कामांचे नियोजन करा – राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

विकास कामांसाठी शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांचा प्राधान्याने विचार करा

कोल्हापूर, दि. 2 : श्री अंबाबाई मंदिर परिसरातील विकास कामांचे नियोजन करताना शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांचा प्राधान्याने विचार करा. स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेवून या परिसरातील कामांचे नियोजन करा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केल्या.

 पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या विविध प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यकारी अध्यक्ष श्री. क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, भूसंपादन अधिकारी शक्ती कदम, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, उपअभियंता सुयश पाटील, संबंधित अधिकारी, किरण नकाते, अजित ठाणेकर तसेच स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 श्री. क्षीरसागर म्हणाले, तिरुपती, श्रीसिद्धिविनायक, शिर्डी या देवस्थानांच्या धर्तीवर अंबाबाई मंदिर परिसराचा विकास व्हायला हवा. मात्र सुधारणा करताना स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही, त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेऊनच कामांचे नियोजन करावे. सुरुवातीला शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांची तपासणी करुन विकासासाठी ताब्यात घ्याव्यात, उर्वरित कामांसाठी गरज भासल्यास खासगी जागांचा विचार व्हावा, असे स्पष्ट करुन याविषयी व्यापारी, स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल. तसेच आवश्यकतेनुसार राज्यस्तरावर बैठकीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

 श्री अंबाबाई मंदिर परिसरात धार्मिक कार्य, भाविकांसाठी पिण्याचे पाणी, अन्नछत्र, निवास व्यवस्था, स्वच्छतागृह, माहिती केंद्र आदी सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *