आडी(राजू पाटील): आडी (ता. निपाणी) येथे श्री दत्त समर्चन समारोहात भाविकांचा उदंड प्रतिसाद, अर्चन भक्ती ही सर्वांसाठी सोपी आहे. त्यामुळे निष्ठा ठेवून जीवनरूपी पुष्प संपूर्णत्वाने अर्पण करणे आवश्यक आहे. तेंव्हाच माणसाचा उध्दार होतो. अध्यात्मधन सर्वांसाठी आहे. केवळ भौतिक धन महत्वाचे नाही. पुण्यरूपी धन, ज्ञानधन, विविध सद्गुणरूपी धन मिळवून आध्यात्मिक वाटचाल करावी, हा विश्वावसु संवत्सराचा संदेश आहे, असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले. ते आडी (ता. निपाणी) येथील संजीवनगिरी वरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने आयोजित केलेल्या श्री दत्त समर्चन समारोहाच्या कार्यक्रमातील प्रवचनात बोलत होते.

Advertisements

    यावेळी सकाळी श्रीदत्तगुरूंच्या चरणचिह्नांवर अभिषेक अर्पण करून महाआरती करण्यात आली. त्यानंतर श्रीदत्तयागरूप होमहवन, नामजप आदी विविध धार्मिक कार्यक्रम दिवसभर भक्तीमय वातावरणात पार पडले. सांयकाळी साडेपाच वाजता श्रीदत्तगुरूंच्या चरण चिन्हांवर वेदमंत्रोच्चारासह षोडशोपचार पूजा करून बेलफुले अर्पण करण्यात आली. यावेळी असंख्य भाविकांनी समर्चन समारोहात सहभाग घेऊन अनेक तीर्थक्षेत्रांवरून तसेच परिसरातील नदी, सरोवर, विविध कुंड, विहिरी इ. आणलेले जल, बेल, फुले, तुलसी दल इत्यादी श्री दत्तगुरुचरणांवर अर्पण करून भक्तीचा सुखद अनुभव घेतला. यावेळी स्त्री पुरुष ,आबाल वृद्धांनी समर्चन समारोहात उत्साहाने सहभाग घेऊन परमपुण्यप्रद अशा आध्यात्मिक पर्वाचा लाभ घेतला. यावेळी भाविकांनी रामेश्वर, जगन्नाथपुरी, बदरीनाथ व्दारका, केदारनाथ, अमरनाथ, पुष्कर, काशी, प्रयागराज, गिरनार, पीठापूर, कुरवपूर, गाणगापूर, श्रीशैल, सौदत्ती, पंढरपूर ,नृसिंहवाडी इत्यादी देशभरातील अनेक क्षेत्रांवरून तसेच गंगा, यमुना, नर्मदा, कृष्णा, भीमा इत्यादी देशभरातील नद्यांमधून आणलेले पवित्र जल अर्पण केले.

Advertisements

     यावेळी बोलतांना प.पू. परमात्मराज महाराज पुढे म्हणाले की, मानवी जीवनात भक्ती भावनेचे विशेष महत्व आहे. भक्ती भावनेने आणलेले जल, फुले, बेल, तुलसीदल इ. अर्पण केल्याने सम्यक अर्चन होते.

Advertisements

    मल्हार नांवाचा युवक मानसपूजा करायचा. त्यामध्ये समर्पणाच्या भावनेने तल्लीन होऊन जायचा. मानस पूजेच्या स्थितीत  पाणी आणतांना तो पडला आणि पाण्याचा घट ही पडला. तेव्हा आता पूजा कशी करायची? ही विवंचना करू लागला. इतक्यात त्याला आकाशवाणी ऐकायला आली. तुझे पाणी मला पोहचले. हे सगळे मानसपूजेच्या तल्लीनतेमध्ये चालू होते. आकाशवाणी ऐकायला मिळाल्याने त्याला खूप आनंद झाला. मानसपूजेमधील पूर्ण समर्पण युक्त भावनेने दिलेले ही देवाला पोहचत असते. पुढे चालून तो संत मल्हारस्वामी झाला. मानसपूजेचे हे महत्व आहे. द्रव्य पूजेचेही महत्व आहे. अर्चन भावनेशी पूर्ण अर्पणभाव संयुक्त व्हावा. रामकृष्ण परमहंस महान योगी झाले. तरीही ते दक्षिणेश्वरी काली देवीची शेवटपर्यंत पूजा करीतच राहिले. आध्यात्मिक उन्नत अवस्था प्राप्त असतांनाही त्यांनी अर्चन भक्ती करून दुसऱ्यांसाठी आदर्श संदेश दिला.

    मनुष्य पाण्याशिवय जगू शकत नाही. जलचर प्राणी, झाडांच्या मध्येही पाण्याचे भरपूर प्रमाण असते, तेही पाण्याशिवाय जगत नाहीत. मानवदेह हा पाण्याचा घट आहे. पाण्याचा घट देवाला अर्पण करणे म्हणजे देहरूपी घट अर्पण करणे, आयुष्यरूपी धन अर्पण करणे, असे समजून घ्यावे. पुण्यधनाचे, ज्ञानधनाचे, सद्गुणरूपी धनाचे महत्व आहे. यदुराजाकडे समृद्धी होती, भौतिकधन होते. मात्र तो  दत्तगुरूंची साधना करायचा. अलर्क राजानेही सर्व सोडून आध्यात्मिक धन मिळविण्यासाठी साधना केली. व्यवहारिक धनाने व्यावहारिक गोष्टी मिळतात. आपल्याला आध्यामिक ज्ञानधनाची गरज आहे. रावणाकडेही धन होते. पण त्याला कोणीही चांगले म्हणत नाही.मनुष्याजवळ सद्गुण,  अध्यात्म ज्ञान धन किती आहे, हे पाहिले जात असते. आयु राजा, भर्तृहरी राजा तसेच अनेक ऋषी, मुनी, सिद्धादिकांनी सम्यक अर्चनाद्वारे भक्ती केली. पूजेचे, योगाचे, ज्ञानाचे महत्व आहे. अनेकांची मतं विविध स्वरूपाची आहेत. त्यामुळे विविध मार्ग सर्वांसाठी मोकळे ठेवले आहेत.  भक्ती भावनेने मन शुद्ध होते. अध्यात्म  मार्गाच्या पुढील गोष्टीसाठी मन तयार होत असते.

    एका साधूने एका व्यक्तीला विचारले की समुद्रातून घट भरून आणलास, त्या समुद्रात किती पाणी आहे. तेव्हा त्या व्यक्तीने उत्तर दिले की मी घागर भरून आणली. आता उरले सुरले असेल त्या समुद्रात. हे उत्तर अहंकाराचे आहे. सर्वव्यापक असा चैतन्य समुद्र आहे. त्यात जीव एक अंश आहे. अज्ञानामुळे जीव हा समुद्राला उरले सुरले समजतो आहे. जग फार मोठे आहे, आपण सर्वव्यापक चैतन्याचा एक अंश आहोत, हे मनुष्यांनी समजून घेऊन अभिमान संपविण्यासाठी हा सम्यक् अर्चन समारोह आहे. केवळ दत्तगुरुंच्या चरणधुळीमुळे यदुराजा सारख्या अनेक सद्भक्तांनी भोग व मोक्ष मिळविला. अर्चन भक्ती स्वयंभू मन्वंतरा पासून केली जात आहे. श्री दत्त समर्चन समारोह हा
सम्यक भावनेने करावयाचा अध्यात्म समारोह आहे. अध्यात्म समारोह म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या आरोहण करण्यासाठी म्हणजेच उन्नत होण्यासाठी आध्यात्मिक समारोह आहे.

     आसाम, बंगाल आदी भागांमध्ये त्रिनाथ मेळा भरवून समर्चन रूपिणीभक्ती केली जात असते. आसाम, बंगाल इत्यादी राज्यांमध्ये भगवान् दत्तात्रेयांना लोक “त्रिनाथ” म्हणतात. आत्मस्वरूप धन हे विश्वासाठीचे धन आहे. हिंदूमध्ये, मुस्लिमांमध्ये , ख्रिश्चनांमध्ये तसेच इतरही सर्वांमध्ये एकच आत्मचैतन्य स्वरूप आहे. ही  ऐक्याची भावना आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भेदाला जागा नाही. नास्तिक लोक युवा वर्गाला कुजवितात. नास्तिक विचारांनी जीवनरूपी फुलांना कुजवून संपवू नये. आयुष्य कधी संपेल सांगता येत नाही, म्हणून योग्य वेळी योग्य ठिकाणी जीवनरूपी फुल अर्पण करून आध्यत्मिक वाटचाल करावी. जीवनामध्ये कितीही अडथळे आले तरी भक्तीरूप साधना चालू ठेवावी. एक ना एक दिवस अडथळे निश्चित संपतील अशी दृढ भावना ठेवून उपासनारूप साधना करीत राहावे, असे सांगितले.

    यावेळी दीपक कदम हणबरवाडी, रणजीत कदम कागल, पुरोहित अविनाश जोशी मांगूर, दिगंबर जोशी नृसिंहवाडी, अजय पुराणिक कागल, संदीप बादरायणी पुणे, अवधूत जोशी कोल्हापूर, संकेत जोशी, संतोष वाशीकर हुपरी, महेश कुलकर्णी कुन्नूर, अभियंता विठ्ठल मगदूम कोल्हापूर, उद्योगपती एस.टी.पाटील, सुखदेव साळुंखे, सतीश भोजे कोल्हापूर, निलेश खोत कोगनोळी, प्रसन्नकुमार गुजर, ए.डी. चौगुले (भोगावती शुगर) आदी मान्यवरांचा प.पू. परमात्मराज महाराज व देवीदास महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आडी परिसरासह कर्नाटक, महाराष्ट्रातून आलेल्या हजारो भाविकांनी श्रीदत्तसमर्चन समारोह, प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घेतला.

Advertisements

By G1 G2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *