सीआरपीएफ ग्रुप सेंटरमध्ये १८ वा रोजगार मेळावा संपन्न
पुणे : “केंद्र सरकारचे मुख्य लक्ष सर्वसमावेशक विकास आणि आर्थिक सक्षमीकरणावर असून, नवनियुक्त उमेदवारांनी विकसित भारत @2047 च्या संकल्पात आपले योगदान द्यावे,” असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.

पुण्यातील ग्रुप सेंटर, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) येथे आयोजित १८व्या रोजगार मेळाव्यात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. या मेळाव्यात सीआरपीएफ, बीएसएफ, बँक ऑफ बडोदा यांसारख्या विविध सरकारी विभागांतील ३०० उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले.

यावेळी सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक वैभव निंबाळकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पारदर्शक भरती प्रक्रियेमुळे गुणवंत तरुणांना देशसेवेची संधी मिळत असल्याची भावना उमेदवारांनी यावेळी व्यक्त केली.