कोल्हापूर हद्दवाढविरोधात ग्रामीण भागाचा कडकडीत बंद; निवडणुकीवर परिणामाची शक्यता

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीला विरोध दर्शवण्यासाठी जिल्ह्यातील २० ग्रामीण गावांनी मोठ्या प्रमाणात ‘बंद’ची हाक दिली होती. या बंदला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे, ज्यामुळे आगामी काळात हद्दवाढीचा मुद्दा अधिक ज्वलंत होण्याची चिन्हे आहेत.

Advertisements

बंदमध्ये गोकुळ शिरगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. कणेरी मठ परिसर आणि उजळवाडी परिसरातही व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून हद्दवाढीस विरोध दर्शवला. काही ठिकाणी बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला, तर काही गावांमध्ये संमिश्र प्रतिसाद दिसून आला.

Advertisements

गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर शहराची हद्दवाढ हा एक संवेदनशील मुद्दा बनला आहे. शहरी भागातील नागरिक शहराच्या विकासासाठी आणि वाढत्या गरजांसाठी हद्दवाढ आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत आहेत, तर ग्रामीण भागातील जनतेचा या हद्दवाढीला तीव्र विरोध आहे.

Advertisements

हद्दवाढ झाल्यास ग्रामीण भागातील जमिनीचे दर, कराचे नियम आणि स्थानिक संस्कृतीवर परिणाम होईल अशी भीती त्यांना वाटते. विशेषतः आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हद्दवाढीचा मुद्दा ग्रामीण राजकारणात महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. अनेक उमेदवारांनी हा मुद्दा उचलून धरल्याने, निवडणुकीत याचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ग्रामीण भागातील मतांवर या मुद्द्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

पुढील काळात कोल्हापूरची हद्दवाढ होईल की नाही, यावर केवळ स्थानिक नागरिकांचेच नव्हे, तर जिल्हा आणि राज्य पातळीवरील राजकीय वर्तुळाचेही लक्ष वेधून राहिले आहे. हा मुद्दा कोल्हापूरच्या विकासासाठी आणि राजकीय समीकरणांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!