कोल्हापूर: आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दर्जेदार आणि ‘लिंकिंग’शिवाय कृषी निविष्ठा (खते, बियाणे, कीटकनाशके) मिळाव्यात यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी उत्पादक आणि विक्रेत्यांना सक्त सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या खतपुरवठा आढावा बैठकीत ते बोलत होते.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात मंजूर कोट्यानुसार १०० टक्के खतांचा पुरवठा झाला असून, युरिया, डीएपी, एमओपी, संयुक्त खते आणि एसएसपी यांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. मात्र, डीएपीचा पुरवठा काहीसा कमी असल्याने पर्यायी खतांचा वापर करण्याचं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.

या बैठकीत शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी ‘लिंकिंग’च्या मुद्द्यावर आवाज उचलत तात्काळ कारवाईची मागणी केली. यावर पालकमंत्र्यांनी भरारी पथकांना निकृष्ट निविष्ठांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.

तसेच, सर्व विक्री केंद्रांबाहेर तक्रार निवारण कक्षाचा मोबाईल क्रमांक (९५२९७७२५२१) आणि क्यूआर कोड स्पष्टपणे लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. शेतकऱ्यांनी कोणत्याही अडचणीसाठी त्वरित संपर्क साधण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. या बैठकीला कृषी विभागाचे अधिकारी, खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी आणि वितरक उपस्थित होते.