अवकाळी पावसाचा तडाखा: कोल्हापूर जिल्ह्यात तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

कोल्हापूर : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने शेती, फळपिके, घरे आणि गोठ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत. आज झालेल्या एका तातडीच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.

Advertisements

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित या बैठकीत जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी येडगे यांनी ३१ मे २०२५ पूर्वी नुकसानीचा अंतिम अहवाल सादर करण्याचे बंधन घातले आहे. त्यासाठी पंचनामे पथकांची तातडीने स्थापना करून उद्यापासूनच कामाला सुरुवात करावी असेही त्यांनी सांगितले.

Advertisements

याव्यतिरिक्त, भविष्यातील नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी तयारीचा भाग म्हणून, निवारा केंद्रांची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती कामे दोन दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसेच, १ जून २०२५ पासून तालुका स्तरावरील आपत्ती नियंत्रण कक्ष पूर्णवेळ कार्यरत ठेवण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. गावपातळीवरील यंत्रणा, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक अद्ययावत ठेवण्यावरही त्यांनी भर दिला.

Advertisements

पर्यटन स्थळे, धरणे आणि धबधब्यांवरील सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्याचे निर्देशही देण्यात आले, तसेच भूस्खलन होण्याची शक्यता असलेल्या ८६ गावांमध्ये सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले.

Leave a Comment

error: Content is protected !!