कोल्हापूर – करवीर तालुक्यातील डोणवडे येथे ८ मे रोजी होणाऱ्या बेकायदेशीर मेंढ्यांच्या झुंजीच्या कार्यक्रमाची आणि गडहिंग्लज तालुक्यातील भाडगाव येथे ८ आणि १० मे रोजी होणाऱ्या अनधिकृत घोडा आणि घोडागाडी शर्यतींची पोस्टर्स मिळाल्यानंतर, पीपल फॉर एथीकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स (PETA) इंडियाने त्वरित आणि यशस्वीरित्या कोल्हापूर पोलिसांना माहिती देऊन आणि त्यांच्या सहकार्याने हे बेकायदेशीर कार्यक्रम थांबवले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हे कार्यक्रम होऊ दिले नाहीत.

PETA इंडियाच्या विनंतीनंतर, गडहिंग्लज पोलीस स्टेशनने घोडा आणि घोडागाडी शर्यतींच्या आयोजकांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), २०२३ च्या कलम १६८ अंतर्गत नोटीस जारी करून बेकायदेशीर कृत्य थांबवले. बेकायदेशीर मेंढ्यांच्या झुंजीच्या कार्यक्रमाच्या आयोजकांना करवीर पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेण्यात आले आणि त्यांनी असा बेकायदेशीर कार्यक्रम आयोजित करणार नाही असे लेखी निवेदन दिले.

PETA इंडियाच्या क्रूरता निवारण समन्वयक सलोनी साकारिया म्हणतात, “ज्यामध्ये प्राण्यांना लढण्यासाठी किंवा शर्यतीत धावण्यासाठी सक्ती केली जाते, असे खेळ क्रूर, हिंसक आणि बेकायदेशीर आहेत. मेंढ्यांच्या झुंजी आणि घोडागाडी शर्यतींमुळे प्राण्यांना शारीरिक दुखापत आणि मानसिक आघात यांसारखे प्रचंड दुःख होते. कोल्हापूर पोलिसांनी, विशेषतः करवीरचे उपअधीक्षक पोलीस श्री. सुजितकुमार क्षीरसागर आणि गडहिंग्लजचे उपअधीक्षक पोलीस श्री. रामदास इंगवले यांनी प्राण्यांवरील क्रूरता सहन केली जाणार नाही, असा संदेश दिल्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो.”

मेंढ्यांच्या झुंजीत दोन नर मेंढ्यांना हिंसक आणि अनेकदा रक्तरंजित लढाईसाठी एकमेकांविरुद्ध उभे केले जाते. प्राण्यांना मारहाण केली जाते आणि एकाला विजेता घोषित करेपर्यंत लढण्यासाठी चिथावले जाते. या पद्धतीमुळे त्यांना फॅक्चर, पंक्चर आणि गंभीर तणावासारख्या शारीरिक आणि मानसिक इजा होतात.

शर्यतीसाठी वापरल्या जाणाऱ्या घोड्यांना चाबूक आणि इतर साधनांचा वापर करून अत्यंत वेगाने धावण्यास भाग पाडले जाते, ज्यामुळे त्यांना वारंवार दुखापत होते आणि फुफ्फुसातून रक्तस्त्राव देखील होऊ शकतो. २०१६ मध्ये, राजस्थान उच्च न्यायालयाने भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या अहवालाचे पुनरावलोकन केल्यानंतर राजस्थानमध्ये टांगा शर्यतींवर बंदी घातली. अहवालात नमूद केले आहे की, जेव्हा घोड्यांना मोठ्या आवाजाच्या गाड्या आणि मोठ्या संख्येने असलेल्या प्रेक्षकांच्या दरम्यान धावण्यास भाग पाडले जाते, तेव्हा त्यांना भीती आणि त्रास होतो आणि ते क्रूरतेला बळी पडतात.