महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानासाठी शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी एक माहिती पुस्तिका तयार केली आहे. ही पुस्तिका फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
पुस्तिकेत काय आहे?
या माहिती पुस्तिकेत शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी विविध महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले आहे, ज्यात खालील प्रमुख घटक समाविष्ट आहेत:

- फलोत्पादन लागवड आणि पायाभूत सुविधा विकास: फळ, फुल आणि मसाला पिकांची लागवड, मधुमक्षिका पालन, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, तसेच औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड याविषयी सविस्तर माहिती.
- पाणी व्यवस्थापन: सामूहिक शेततळे आणि वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण.
- संरक्षित शेती: हरितगृह आणि शेडनेटद्वारे नियंत्रित शेती.
- व्यवस्थापन तंत्रज्ञान: एकात्मिक अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापन, काढणी पश्चात तंत्रज्ञान व प्रक्रिया, शीतगृह, पॅकहाऊस, आणि पणन व्यवस्थापन.
- यांत्रिकीकरण आणि अभियान: फलोत्पादन यांत्रिकीकरण, राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान, आणि समूह विकास कार्यक्रम.
या पुस्तिकेमध्ये अभियानातील सर्व घटक, मापदंड, सुधारणा आणि अर्ज प्रक्रिया यांची सविस्तर माहिती दिली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाची उद्दिष्ट्ये
केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सन २००५-०६ पासून राष्ट्रीय फलोत्पादन अभियान राबविण्यात आले आहे. सन २०१४-१५ पासून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये केंद्र शासनाचा ६०% तर राज्य शासनाचा ४०% सहभाग असतो. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. याची प्रमुख उद्दिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
- सर्वांगीण विकास: वैविध्यपूर्ण कृषी हवामान विभागानुसार प्रादेशिक अनुकूलता व गरजा लक्षात घेऊन, त्या-त्या प्रदेशातील फलोद्यान क्षेत्राचा संशोधन, तंत्रज्ञान, प्रसार, काढणीत्तर तंत्रज्ञान, प्रक्रिया व पणन सुविधा यांच्या माध्यमातून समूह पद्धतीने सर्वांगीण विकास करणे.
- आर्थिक व पोषणमूल्य वाढ: शेतकऱ्यांचे आर्थिक राहणीमान उंचावणे व आहाराविषयी पोषणमूल्य वाढविणे.
- योजनांमध्ये समन्वय: अस्तित्वात असलेल्या फलोत्पादन विषयक विविध योजनांमध्ये समन्वय साधून एकरूपता आणणे.
- तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार: पारंपरिक उत्पादन पद्धतीची आधुनिक शास्त्रीय ज्ञानाशी सांगड घालून तंत्रज्ञानाचा विकास, प्रसार आणि प्रचार करणे.
- रोजगाराच्या संधी: कुशल आणि अकुशल, विशेषतः बेरोजगार तरुणांसाठी रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे.
राबविण्यात येणाऱ्या बाबी आणि नवीन घटक
या अभियानांतर्गत दर्जेदार लागवड साहित्य निर्मिती, नव्या फळबागांची लागवड, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, सामूहिक सिंचन क्षमता वाढवण्यासाठी शेततळे, हरितगृह व शेडनेटद्वारे नियंत्रित शेती, एकात्मिक अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापन, काढणीपश्चात तंत्रज्ञान व प्रक्रिया, शीतगृह, पॅकहाऊस, पणन व्यवस्थापन इत्यादींचा समावेश असून, मनुष्यबळ विकासावरही विशेष भर देण्यात आला आहे.
सन २०२५-२६ पासून समाविष्ट नवीन घटक:
- उच्च तंत्रज्ञान आधारित नर्सरी
- कमी खर्चाचे आळिंबी प्रकल्प
- औषधी व सुगंधी वनस्पती लागवड
- सौर ऊर्जेवर आधारित साठवण व वाळवण प्रकल्प
- संरक्षित शेती घटकांतर्गत तणरोधक मॅट, फ्रुट बॅग/कव्हर, हायड्रोपॉनिक्स इ.
अर्ज प्रक्रिया आणि संपर्क
शासनाने अर्ज प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुलभ करण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in या एकसंध पोर्टलची निर्मिती केली आहे. ‘प्रथम अर्ज, प्रथम लाभ’ या तत्त्वावर लाभार्थी निवड केली जात आहे. Agristack प्रकल्पांतर्गत युनिक फार्मर आयडीच्या माध्यमातून कागदपत्रांची पुन्हा गरज भासत नाही, यामुळे वेळ आणि खर्चात बचत होते. अनुसूचित क्षेत्र व वनपट्टा धारकांसाठी वाढीव अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत.
या पुस्तिकेच्या अधिक माहितीसाठी, आपल्या संबंधित गावाचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संचालक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
ही माहिती पुस्तिका ऑनलाईन पाहण्यासाठी खालील QR Code स्कॅन करू शकता.