मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड शहरात बार कॉलन्यातील नऊशे नळ कनेक्शन एक लाख लिटरच्या जलकुंभाद्वारे जोडण्यात आल्याने परिसरातील नागरिकांना अल्प व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्याऐवजी चार ते पाच लाख लिटर क्षमतेची साठवण क्षमता असणारे जलकुंभ करावेत अशी मागणी नागरिकांनी नगर परिषदेकडे केली आहे.
शहरात नऊ कोटीची नवीन पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरली आहे. पालिकेचे ढिसाळ नियोजन व ठेकेदाराकडून करण्यात आलेली घिसाड घाई यामुळे अद्याप नवीन पाणीयोजना योग्य पद्धतीने कार्यान्वीत नाही. हे पाणी तळ मजल्यावर सुद्धा व्यवस्थित पोहचत नाही. पाणी ओढण्यासाठी नागरिकांना विद्युत मोटरपंपचा आधार घ्यावा लागतो यातून वीज खर्चाचा भुर्दंड सोसावा लागतो. व पाण्याच्या जागी विद्युत मोटरपंप बसविणे धोकादायक आहे.

नवीन पाणी योजनेद्वारे शहराला पाणीपुरवठा करताना जे जलकुंभ बांधले (पाण्याच्या टाक्या ) ते सखल भागात जास्त साठवण क्षमतेचे (तीन ते चार लाख लिटर क्षमता) जलकुंभ आहेत व उंचावर केवळ एक लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ आहेत. येथील पोतदार कॉलनीत उंच जागेत १ लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ आहे यावर कापशी रोड देशमुख कॉलनीसह अंबाई बरकाळे, सुर्यवंशी महाजन ,साई ‘प्रगती माने’ शिवाजी पार्क, सावर्डेकर, भोसले अशा बारा नागरी वस्तीतील नऊशे नळ कनेक्शनना पाणीपुरवठा केला जातो पण तो कमी दाबाने व अत्यल्प प्रमाणात होत आहे. या परिसरात नागरिकांना पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. जादा साठवण क्षमतेचे दोन जलकुंभ या परिसरात बांधल्यास पाणी प्रश्न संपुष्टात येईल. यासंदर्भात नागरिकांनी मुरगूड पालिका मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांना निवेदन सादर केले.
निवेदन देणाऱ्या नागरी शिष्टमंडळात नामदेव चौगले, एम टी सामंत ,एल व्ही शर्मा, प्रदीप वर्णे, एस बी सावंत, श्री. शिकलगार श्री चव्हाण आदिंचा समावेश होता. पालिका मुख्याधिकाऱ्यांना पाणी प्रश्नासंदर्भात निवेदन देताना नागरिकांचे शिष्टमंडळ