“जे काही होत आहे, ते तुमच्या समोरच…”
मुंबई: ‘हेरा फेरी 3’ चित्रपटातील परेश रावल यांच्या बाहेर पडण्यावरून सुरू असलेल्या वादावर अभिनेता अक्षय कुमारने अखेर आपलं मौन सोडलं आहे. अक्षय कुमारने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणावर भाष्य करताना म्हटलं आहे की, “जे काही होत आहे, ते तुमच्या समोरच होत आहे. मी बोटांवर क्रॉस करून आशा करतो की सर्व काही ठीक होईल. सर्व काही ठीक होईल याची मला खात्री आहे.”
गेल्या काही दिवसांपासून ‘हेरा फेरी 3’ हा चित्रपट आणि त्यातील कलाकार परेश रावल यांच्या बाहेर पडण्यामुळे चर्चेत आहे. परेश रावल यांनी अचानक चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. यानंतर अक्षय कुमारच्या प्रॉडक्शन हाऊस ‘केप ऑफ गुड सिनेमा’ने परेश रावल यांच्यावर २५ कोटी रुपयांचा दावा दाखल केल्याचं समोर आलं होतं.

परेश रावल यांनी चित्रपटासाठी साइनिंग अमाऊंट म्हणून ११ लाख रुपये घेतले होते आणि नंतर त्यांनी हा चित्रपट सोडला, ज्यामुळे निर्मात्यांना मोठं नुकसान झाल्याचं अक्षयच्या प्रॉडक्शन हाऊसचं म्हणणं होतं.
या वादावर परेश रावल यांनीही आपली बाजू मांडली होती. त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केलं होतं की, चित्रपटासाठी कोणताही अधिकृत करार किंवा स्क्रिप्ट त्यांना देण्यात आली नव्हती. तसेच, त्यांनी घेतलेली साइनिंग अमाऊंट व्याजासह परत केली असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.
या सर्व घडामोडींदरम्यान, अक्षय कुमारने या प्रकरणावर पहिल्यांदाच स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आहे. त्याचं हे विधान चाहत्यांमध्ये आणि बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरलं आहे. आता ‘हेरा फेरी 3’ चं भविष्य काय असेल आणि राजू, श्याम आणि बाबूरावची ही iconic तिकडी पुन्हा पडद्यावर एकत्र येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.