गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : नेर्ली-तामगाव ते उजळाईवाडीला जोडणारा रस्ता बंद केल्यामुळे आणि त्याला कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध करून न दिल्यामुळे तामगावच्या ग्रामस्थांनी काल (रविवार) ग्रामपंचायत कार्यालयात तीव्र संताप व्यक्त केला. जोपर्यंत पर्यायी रस्ता मिळत नाही, तोपर्यंत शांत बसायचे नाही, असा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी केला.
या पार्श्वभूमीवर तहसीलदार स्वप्निल रावडे, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, मंडलाधिकारी संदीप पोवार, तलाठी नीलांबरी पवार आणि कोतवाल शामबाला कुंभार यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची तातडीची बैठक घेण्यात आली.

ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम
या बैठकीत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थ बंद केलेला रस्ता पूर्ववत करण्याच्या मागणीवर ठाम होते. ग्रामस्थांचा वाढता आक्रोश पाहून अधिकारी बैठक सोडून निघून गेले. “विमानतळासाठी आमच्या जमिनी घेतल्या, मग गावाला रस्ता का नाही?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना विचारला.
आगामी निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा
आमदार आपल्या मागणीची दखल घेत नसतील, तर आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्धारही ग्रामस्थांनी यावेळी केला. “रस्त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना किती वेळा भेटायचे?” असा प्रश्नही त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला.

निधीअभावी पर्यायी रस्त्याचे काम थांबले यावर प्रांताधिकारी प्रसाद चौगुले यांनी सांगितले की, निधीअभावी पर्यायी रस्त्याचे काम करता येत नाहीये आणि भूसंपादनामध्येही अडचणी येत आहेत. तसेच, रस्ता बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला असून, त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा करावी लागेल, असेही ते म्हणाले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात यावर तोडगा काढण्यासाठी बैठक झाली असून, लवकरच काहीतरी मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे.
या बैठकीला महेश पिंपळे, विश्वास तरटे, हेमंत पाटील, अभिजीत मोहळकर, भाईजान अन्सारी, विकी मुजावर, स.पो.नि. टी. जे. मगदूम, संजय माने आदी उपस्थित होते.
या प्रश्नावर प्रशासन काय तोडगा काढते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.