करनूर येथील शेतीपंपाची वीज वारंवार खंडित करुन विज मंडळ देतंयं शेतक-याना शॉक, अधिका-याना कोंडून घालण्याचा इशारा
कागल/ प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यामध्ये शेतीपंपाची लाईट कुठेही कपात केली जात नाही. पण करनूर ता. कागल येथील शेतीपंपाची वीज वारंवार खंडीत केली जाते. वर्ष,दोन वर्षे झाली असे चालू आहे. वरुन उन्हाचा तडाखा आणी खालुन पाण्याचा कडाका.पिकं वाळवून वीज मंडळ देतय शेतक-याना शॉक यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांचा उद्रेक होणार अन् शेतकरी जोरदार आंदोलन छेडणार. अशी आजची अवस्था आहे.
शुक्रवार, शनिवार, रविवार हे तीन दिवस लाईट दिवसा असते, तसेच रविवार रात्री, सोमवार, मंगळवार, बुधवार हे चार दिवस रात्रीची शेतीपंपाची लाईट असते. यामध्ये एकही दिवस असा नाही की पूर्ण आठ तास लाईट शेतकऱ्यांसाठी मिळाली आहे. या रात्रीच्या व दिवसाच्या शेती पंपाच्या लाईट मध्ये दररोज महावितरण च्या अजब कारभारामुळे चार – चार तास लाईट घालवली जाते. शेतकऱ्यांनी विचारले असता लोड शेडिंग आहे ,वरून गेली आहे, लाईन फॉल्टी आहे अशी कारणे शेतकऱ्यांना सांगुन महावितरणचे कर्मचारी शेतक-यांना वेड्यात काढत आहेत.


यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांनी याबाबत विचारले असता उडवा उडवीची व उर्मट उत्तरे दिली जातात. यामुळे शेतकऱ्यांना रात्रंदिवस शेतातच राहावे लागत आहे. त्यात उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. उष्मा भरपूर प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे हाता- तोंडाशी आलेली पिके वाळू लागली आहेत. त्यातच महावितरणच्या अजब कारभारामुळे शेतकऱ्याची झोपच उडाली आहे. आजूबाजूच्या गावांना शेतीपंपाची लाईट सुरळीत आहे. त्यामुळे करनूरच्या शेतकऱ्यांना वाली कोणॽ असा सवाल शेतकरी वर्गातून होत आहे. त्यातच अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट करून अनेक डीपींवरती ज्यादा मोटरींचे कनेक्शन देऊन लोड वाढवून शेतकऱ्यांकडून भरमसाठ पैसे उकळले आहेत. असेही शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.
शासनाचे नुसते आश्वासन….
राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिवसा लाईट देणार असे आश्वासन दिले. त्याची अंमलबजावणी झाली नाही. पण शेतीपंपाची लाईट दिवसा पण नाही रात्री पण नाही. किमान चार तास ही शेतकऱ्यांना लाईट व्यवस्थित मिळत नाही. त्यामुळे करनूर मधील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. या महावितरणच्या मनमानी कारभारामुळे आम्ही सर्व शेतकरी तीव्र आंदोलन करून महावितरण ला जाब विचारणार आहोत.
मा. सरपंच सचिन घोरपडे शेतकरी
… अन्यथा अधिकाऱ्यांना कोंडून घालू
करनूर गावासाठी वीज मंडळाकडून सातत्याने सापत्न पणाची वागणूक शेतकऱ्यांना दिलेली आहे. आज उन्हाची तीव्रता पाहता वास्तविक जादा वेळ देणं उचित असताना दिलेल्या वेळेतही विज कपात करून शेतकऱ्यांना वेठीस धरलं जात आहे. वीज मंडळाकडून अशीच परिस्थिती राहिल्यास करनूर मध्ये येणारे वीज मंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांना कोंडून घालू असा इशारा येथील प्रगतशील शेतकरी जयसिंग घाडगे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे .अधिकाऱ्यांना कोंडून घालण्याचा प्रकार यापूर्वीही शेतकऱ्यानी केला होता.
जयसिंग राजाराम घाटगे
प्रगतशील शेतकरी, करनूर
यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रवीणकुमार कांबळे, कुमार पाटील, तानाजी शिंदे, संभाजी पाटील, रंगराव पाटील, कुमार चौगुले, आनंदराव पाटील, बाळासो धनगर, कृष्णात धनगर सुनील गुदले, कृष्णात कोरे, संजय घोरपडे, संतोष चौगुले, अरविंद चौगुले, म्हाळु शि. धनगर, करसिद्ध धनगर आदीं, करनूर मधील सर्व शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
——————