गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : करवीर तालुक्यातील तामगाव ग्रामपंचायतीचे सदस्य विठ्ठल पुजारी यांना शाळेच्या सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी अपात्र घोषित करण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८-कलम १४ नुसार, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हे आदेश दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तामगाव येथील हेमंत राजेंद्र पाटील, अनिल शिवगोंडा पाटील आणि प्रकाश बंडू जोंधळेकर यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये विठ्ठल पुजारी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. गट क्रमांक ५१७ मध्ये शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर पुजारी यांनी अतिक्रमण केल्याचे त्यांचे म्हणणे होते.

या तक्रारीनंतर, करवीरचे उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी संबंधित जागेची मोजणी केली. त्यांच्या मोजणी नकाशानुसार गट क्रमांक ५१७ मध्ये अतिक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच, मुडशिंगी येथील मंडळ अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यातही गट क्रमांक ५१७ मध्ये अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले.
हे सर्व पुरावे विचारात घेऊन, विठ्ठल पुजारी यांचे अतिक्रमण सिद्ध झाल्याने त्यांना ग्रामपंचायत सदस्यपदावरून अपात्र ठरवण्यात आले आहे. या निर्णयामुळे तामगावच्या स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.