नवी दिल्ली: ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्या ऐतिहासिक अंतराळ प्रवासाने भारताच्या अंतराळ संशोधनाच्या युगाची सुरुवात केली आहे. या प्रवासाने २०२७ मध्ये होणाऱ्या गगनयान मोहिमेसाठी आणि त्यानंतर आठ वर्षांनी उभारल्या जाणाऱ्या भारतीय अंतराळ स्थानकासाठी (Bharatiya Antariksha Station) मार्ग मोकळा केला आहे.
भारताचा स्वतःचा मानव अवकाश उड्डाण कार्यक्रम, ज्यामध्ये अंतराळवीरांना पृथ्वीपासून ४०० किमी वरच्या कक्षेत पाठवले जाईल, यामुळे भारत स्वतःच्या अंतराळयानातून आणि रॉकेटचा वापर करून नागरिकांना अंतराळात पाठवणाऱ्या मोजक्या देशांच्या पंक्तीत सामील होईल.

ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला Shubhanshu Shukla हे ४० वर्षांनंतर अंतराळात पाऊल ठेवणारे पहिले भारतीय ठरले आहेत. याआधी १९८४ मध्ये राकेश शर्मा यांनी तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या अंतराळ मोहिमेत अंतराळ प्रवास केला होता. शुभांशु शुक्ला हे भारतीय हवाई दलाचे अनुभवी फायटर पायलट असून, त्यांना २,००० तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी सुखोई-३० एमकेआय, मिग-२१, मिग-२९, जॅग्वार, हॉक्स डोर्नियर्स आणि एन-३२ सारखी लढाऊ विमाने उडवली आहेत.
या मिशनमध्ये शुभांशु शुक्ला यांच्यासह इतर तीन अंतराळवीरही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (International Space Station – ISS) रवाना झाले आहेत. हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय असतील. हे मिशन गगनयान मोहिमेच्या तयारीचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि यातून भारताच्या भविष्यातील अंतराळ योजनांना बळकटी मिळेल.
भारत २०२७ च्या पहिल्या तिमाहीत ‘गगनयान’ या आपल्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेचे प्रक्षेपण करण्याचे नियोजन करत आहे.
या मोहिमेत ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला यांचा समावेश आहे. हे सर्व भारतीय हवाई दलाचे प्रशिक्षित वैमानिक आहेत आणि त्यांनी रशियातील गॅगारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये सखोल प्रशिक्षण घेतले आहे.