मुंबई, दि. २१: शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी शिष्यवृत्तीच्या संख्येत वाढ करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक वर्षांपासून शिष्यवृत्तीच्या संच संख्येत कोणतीही वाढ किंवा बदल झालेला नाही, त्यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ पोहोचवण्यासाठी हा बदल आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
बैठकीत महत्त्वाचे निर्णय मंत्रालयात झालेल्या एका आढावा बैठकीत विविध शिष्यवृत्ती योजना आणि लाभार्थी संख्या वाढीबाबत चर्चा झाली. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंग देओल, उपसचिव समीर सावंत, शिक्षण संचालनालयाचे (योजना) संचालक महेश पालकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

परीक्षेच्या वेळेत बदल, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढणार सध्या ५ वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी अनुक्रमे उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षा आता इयत्ता ४ थी आणि ७ वीमध्ये घेण्यात याव्यात, असे निर्देश मंत्री भुसे यांनी दिले. या बदलामुळे अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल आणि त्यांचे पुढील शिक्षण सुलभ होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढेल, असे ते म्हणाले. येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना या बदलाचा लाभ मिळावा यासाठी या कामाला गती देण्याचे आवाहन त्यांनी केले.
इतर मागासवर्गीयांनाही सारथी योजनेसारखी मदत छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, मार्गदर्शन आणि विविध प्रकारची मदत दिली जाते. याच धर्तीवर इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती-जमाती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांनाही अशीच मदत करण्याबाबत संबंधित विभागाने प्रस्ताव सादर करावा, असेही शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.