कोणत्याही पक्षांना संविधान बदलण्याचे धाडस केल्यास रक्ताचे पाठ वाहतील – माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर
कागल(प्रतिनिधी) : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा परभणी येथे एका माथेफिरूने अवमान केला आहे. त्यास तात्काळ कठोर शासन व्हावे. त्याच्या पाठीमागे कोणती शक्ती आहे याचा सरकारने छडा लावावा. तसेच आंदोलन करते वकील सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाल्याने पोलीस विभागाची चौकशी व्हावी, परभणी येथे घडलेल्या सर्व प्रकाराबाबत निषेध व्यक्त करत कागल शहर व कागल तालुका मागासवर्गीय संघटनेच्यावतीने तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देण्यात आले.
कागल शहर व तालुक्यातील मागासवर्गीय संघटनेचे कार्यकर्ते कागल तहसील कार्यालयाच्या प्रांगणात एकत्र येत संविधानाची विटंबना करणाऱ्यांचा धिक्कार करत, निषेध व्यक्त केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी निषेध सभाही घेण्यात आली.

आपला देश संविधानाच्या आधारावर चालतो. विटंबना करण्याचे धाडस यांनी केले त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे कोणत्याही पक्षांना संविधान बदलण्याचे धाडस केल्यास रक्ताचे पाठ वाहतील असा इशारा माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी दिला.
एक है तो सेफ है असा नारा काही जण देत आहेत. पण त्यांनी लक्षात ठेवावं संविधान है तो सेफ है बाकी सब कुछ फेक है. ईव्हीएम च्या माध्यमातून संविधान संपवण्याचे काम होत आहे. गृहखात्याचा दुरुपयोग केला जात आहे. आतंकवादी नक्षलवादी असल्याप्रमाणे पोलीस प्रशासन घराघरात घुसून दलितांचा अमानुष छळ करीत आहेत सोमनाथ सूर्यवंशी सारख्या निष्पाप वकिलाचा बळी या शासनाने घेतला असल्याचा आरोप करीत परभणीतील दलितांचे रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत रक्षण करण्याची जबाबदारी सर्वांची असेल असे काहींनी निषेध सभेत बोलताना सांगितले.
यावेळी अजित कांबळे सागर शिंदे रुपेश वाघमारे प्रकाश मोरे बाबा आडे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी विवेक लोटे प्रवीण कांबळे विजय कुरणे तुषार भास्कर आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान परभणी येथील बौद्ध समाजाच्या महामोर्चाला गालबोट लागल्यामुळे परभणी शहरांमध्ये पोलिसामार्फत कोंबिंग ऑपरेशन राबवत सुरू असलेली धरपकड त्वरित थांबवावी. खोटे गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत. विटंबना करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कोठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी याबाबतचे निवेदन राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने तहसीलदारांना देण्यात आले यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील माने, राज्य सल्लागार रावसाहेब चव्हाण, अनिल पवार, करनूरचे माजी उपसरपंच प्रवीण कांबळे, वंदूरचे शिवाजीराव कांबळे,माजी उपनगराध्यक्ष अजित कांबळे, प्रभाकर कांबळेव गणेश कांबळे,अविनाश गाडेकर ,सुनील शिंदे विश्वनाथ गाडेकर ,मारुती गाडेकर सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.