कोल्हापूर: पुणे ते कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे (Pune- Kolhapur National Highway) काम जर ३१ जानेवारीपर्यंत दर्जेदार आणि पूर्ण झाले नाही, तर या महामार्गावरील टोलनाके रद्द करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मॅरेथॉन बैठकीत मुश्रीफ यांनी रस्त्यांच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सातारा-कागल महामार्गाची दुरवस्था झाली असून सेवा रस्त्यांची चाळण झाली आहे, त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश त्यांनी दिले. प्रवाशांना सुखकर प्रवास मिळावा यासाठी ही दुरुस्ती आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

इतर महत्त्वाचे निर्णय:
कडगाव (गडहिंग्लज) हे गाव १००% सौर ऊर्जा (Solar) युक्त करण्यासाठी उर्वरित ₹३ कोटी सीएसआर (CSR) मधून जमा करावेत. कोल्हापूर मनपाच्या गाळेधारकांनी मूळ भाडे रक्कम भरावी आणि मनपाने त्यांच्याकडून व्याज आकारणी करू नये, अशी सूचनाही मुश्रीफ यांनी केली. या बैठकीत अनेक प्रलंबित विषयांचा (Pending Issues) दीर्घ आढावा घेण्यात आला.