कागल (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ चा अंतिम निकाल जाहीर झाला असून, यामध्ये कागल नगरपरिषदेने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. या देदीप्यमान यशाबद्दल नगरपरिषदेला ३ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
लोकसंख्या गटात मारली बाजी
राज्यातील नागरी स्थानिक संस्थांच्या ‘२५ हजार ते ४० हजार’ लोकसंख्या गटात कागल नगरपरिषदेने हे यश संपादन केले आहे. या गटात शिरूर नगरपरिषदेने प्रथम, तर गडहिंग्लज नगरपरिषदेने तृतीय क्रमांक मिळवला आहे.

अभियानाचे वैशिष्ट्य
पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांच्या संवर्धनासाठी हे अभियान १ जून २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत राबविण्यात आले होते. त्रयस्त यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या डेस्कटॉप आणि फील्ड मूल्यमापनात कागल नगरपरिषदेने सर्वाधिक गुण मिळवून आपली बाजी मारली.
बक्षीस रक्कमेचा विनियोग
शासकीय निर्णयानुसार, प्राप्त झालेल्या ३ कोटी रुपयांच्या बक्षीस रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम हरित क्षेत्र वाढवण्यासाठी (वृक्षारोपण व संवर्धन) आणि उर्वरित ५० टक्के रक्कम पर्यावरणपूरक इतर उपाययोजनांसाठी खर्च केली जाणार आहे. कागल नगरपरिषदेच्या या यशामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्व स्तरांतून नगरपरिषदेचे कौतुक होत आहे.
नाम.हसन मुश्रीफ साहेब आणि मा.राजे समरजीतसिंह घाटगे ह्यांचा मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या ह्या मिळालेल्या यशाचे खरे मानकरी सर्व नगरसेवक, आरोग्य कर्मचारी, सर्व स्टाफ आहेत.