कागल : कागल शहरातील सुभाष चौक परिसरात एका युवतीचा डेंग्यूसदृश्य आजाराने मृत्यू झाल्यामुळे कागलमध्ये जनजागृती करण्यात आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलली असून, डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
आरोग्य विभागाच्या पथकाने सुभाष चौक परिसरात घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. साठलेल्या स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या डासांची अळी सात दिवसांत तयार होऊन जन्म घेते, याची माहिती नागरिकांना देण्यात आली. डबके, मडके, घरातील फ्रिज, बॅरेल आणि टेरेस यांसारख्या ठिकाणी पाणी साचू नये, यासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. आठवड्यातून एकदा घरातील पाण्याची भांडी स्वच्छ करावीत, असे आवाहनही करण्यात आले.


डेंग्यूच्या डासांचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी आरोग्य विभागाचे दहा ते बारा कर्मचारी शहरात डास आणि अळ्या शोधण्याची मोहीम राबवत आहेत. या भागात डेंग्यूची अळी किंवा डास आढळले नसल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. परिसरात केलेल्या निरीक्षणात अळीची घनता कमी असल्याचे आढळून आले असून, धोकादायक परिस्थिती नसल्याचे ग्रामीण रुग्णालय आणि हिवताप कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

यावेळी १० ते १२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होते. या निरीक्षणामध्ये महासहाय्यक संचालक सतीश ढेकळे, प्रणव जाधव, सतीश सावंत, जिल्हा हिवताप कार्यालयाचे संजय पाटील, सीपीआर आरोग्य विभागाचे चिखले, ग्रामीण कागल रुग्णालयाचे आरोग्य निरीक्षक दांगड, आरोग्य सेवक प्रकाश पवार आणि प्रतीक पाटील उपस्थित होते. नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन करण्यात आले.
नागरिकांनी आपल्या घराच्या आजूबाजूला स्वच्छता राखावी.
घरात किंवा परिसरात पाणी साचू देऊ नये.आठवड्यातून एकदा पाण्याची भांडी स्वच्छ करावीत. डेंग्यूची लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.अशी विनंती केली.