पुणे : महाराष्ट्रातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) मधील विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न आता आणखी जवळ आले आहे! परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १७ मे २०२५ होती, ती आता वाढवून ६ जून २०२५ पर्यंत करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले आहे.
७५ विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती
दरवर्षी परदेशातील क्यूएस (QS) रँकिंग २०० मध्ये समाविष्ट असलेल्या संस्थांमध्ये पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका तसेच पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. ही शिष्यवृत्ती शाखा आणि अभ्यासक्रमानुसार दिली जाते. त्यामुळे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

अर्ज कसा आणि कुठे करावा?
शिष्यवृत्तीसाठी अर्जाचा नमुना, शासनाचे निर्णय, शिष्यवृत्तीसाठी पात्रतेच्या महत्त्वाच्या अटी व शर्ती यासह सर्व सविस्तर माहिती विभागाच्या www.maharashtra.gov.in किंवा https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करून, तो पूर्ण भरून आवश्यक कागदपत्रांसह ६ जून २०२५ रोजी सायंकाळी ०६.१५ वाजेपर्यंत प्रत्यक्ष किंवा पोस्टाने इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, आकार प्रिमायसेस, दुसरा मजला, एम. एच. बी. कॉलनी, म्हाडा कमर्शिअल कॉम्प्लेक्स समतानगर, येरवडा पुणे-४११००६ येथे दोन प्रतींमध्ये सादर करावा.
या मुदतवाढीमुळे अनेक विद्यार्थ्यांना आपल्या परदेशी शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. त्यामुळे, पात्र विद्यार्थ्यांनी त्वरित अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.