कागल (विक्रांत कोरे) : उन्हाचा तडाखा वाढला आहे. रखरखत्या उन्हाने शेतकरी कासावीस झाला आहे .शेती- शिवारात पाण्याची कमतरता भासू लागली आहे. त्यातच अधून – मधून वीज मंडळ अनेक कारणे सांगत शेतकऱ्यांना शॉक देत आहे. त्यामुळे शेती शिवारातील पिके करपू लागली आहेत.
दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतो आहे. मे महिना म्हणजे रखरखते ऊन. या रखरखत्या उन्हात चिटपाखरू देखील रस्त्यावर फिरकत नाही. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडले आहेत. शेतीची कामे ही मंदावली आहेत. 15 ते 20 दिवसाला पाण्याचा फेर येत आहे. त्यामुळे पिकांना आता करपण्या शिवाय पर्याय उरला नाही.

वीज फॉल्टी आहे, वरून बंद आहे. कधी येईल सांगता येत नाही .या व अशा अनेक कारणांच्या नावाखाली वीज मंडळ दोन दोन ते- तीन -तीन तास वीज गायब करत आहे. वरून उन्हाचा तडाखा,अन् खालून पाण्याची कमतरता यामुळे पिकांची पाने पूर्णतः वाळू लागले आहेत डोक्याला हात लावून बघण्यापलीकडे शेतकऱ्यांकडे पर्याय उरलेला नाही शेतमजूर घामाच्या धारा सोसत आहेत पिकांकडे पाहता, बळीराजाच्या डोळ्या त पाणी येऊ लागले आहे.
त्यातच वळी पावसाने दडी मारली आहे. आकाशाकडे बघत राहण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय राहिला नाही. नदीकाठची पिके बऱ्यापैकी आहेत .परंतु माळरानातील पिके ऑक्सिजनवर किंबहुना आय सी यू मध्येच आहेत .असंच म्हणावं लागेल. शेतकऱ्यांच्या जीवनात हरित क्रांती घडवणारे ऊस हे नगदी पीक आहे. पाण्याअभावी ते तडफडत आहे. उन्हाच्या झळा सोसत आहे. गार पाण्याचा शिडकावा कधी अंगावर पडेल याच्या प्रतिक्षेत ऊस पिके आहेत. पाण्याची कमतरता अधिक गडद होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कामे ही जैसे-थे झाली आहेत. करपलेल्या पिकांना कधी संजीवनी मिळणार याची बळीराजा वाट पाहतो आहे.