कोल्हापूर (जिमाका) :तालुका प्रशासनामार्फत दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तहसील कार्यालयात सकाळी ११:०० वाजता लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. या दिवशी नागरिकांनी आपल्या शासकीय कामकाजासंबंधी तक्रारी लेखी स्वरूपात दोन प्रतीत सादर कराव्यात.
संबंधित विभागाचे अधिकारी तसेच तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित राहून तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न करतात. सर्वसामान्य नागरिक, विविध सामाजिक संस्था, व ग्रामस्थांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन कागल तहसिलदार अमरदिप वाकडे यांनी केले आहे.

प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन साजरा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा निर्णय असून या दिवशी नागरिकांना त्यांच्या विविध शासकीय तक्रारी, मागण्या व अडचणी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळते.
लोकशाही प्रणालीत नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा दिवस त्या सहभागाचे सशक्त माध्यम ठरतो. जेणेकरून त्यांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचून वेळेत निवारण होऊ शकेल. शासनाचा हा उपक्रम पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी राबवण्यात येत आहे.