
गोकुळ शिरगांव (सलीम शेख) : गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या तामगाव ता. करवीर येथे स्मशान भूमीजवळ असलेल्या आडाचे पुनर्वसन करण्याची मागणी येथील बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. तीस वर्षाहून अधिक काळ हा आड तसाच ढासळलेल्या अवस्थेत पडून आहे. ग्रामपंचायतीला यापूर्वी पुनर्वसन करण्याची मागणी केली होती मात्र त्या कडे दुर्लक्ष झाले. वाढत्या लोकसंख्येमुळे तामगाव येथे पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
पिण्याचे पाणी चार ते पाच दिवसांनी येते त्यामुळे पाण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे.उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तामगावमध्ये अनेक भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. नागरिकांकडून टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.या पूर्वी या आडाचं पाणी पिण्याबरोबरच गुरांसाठी,कपडे धुण्यासाठी म्हणून केला जात होता.पण पाण्याची समस्या अधिकच भेडसावत असल्याने ग्रामपंचायतीने लक्ष घालून पडीक व बंद अवस्थेत असलेली विहीरचे पुनर्वसन करणे हि काळाची गरज बनली आहे.
सध्या वारंवार खर्चासाठी पाणी विकत घेणे परवडत नाही. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावकऱ्यांनी या वर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायतीकडे धाव घेतली आहे. ग्रामपंचायतीने सकारात्मक पावले उचलून विहिर पुनर्वसनाचे काम करून विहिरीतील गाळ काढावा त्याची दुरुस्ती करावी त्यामुळे गावातील जलस्तर वाढेल.पिण्याच्या पाण्याची बचत होईल शिवाय नागरिकांना मुबलक पाणी मिळून पाण्याचा प्रश्न मिटेल.
गेल्या पस्तीस वर्षांपासून पडीक अवस्थेत असलेल्या आडाचे पुनर्वसन करण्यासाठी नागरिक एकवटले आहेत. औधोगिककरणामुळे वाढलेली नागरीवस्तीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सातत्याने गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे ग्रामपंचातीवर ताण पडत असून पाण्याचे वेळापत्रक कोलमडल्याचे चित्र स्पष्ट आहे.
वाढत्या लोकसंख्येने गावात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने मासिक मिटिंग मध्ये पाणी प्रश्नाचा विषय घेत आडाच्या पुनर्वसन करण्यात येईल असा विषय संमत करण्यात आला आहे. लवकरच आडाचे पुनर्वसन होऊन पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे अशा भावना व्यक्त गायत्री गायकवाड (ग्रामपंचायत सदस्या,तामगाव) यांनी केल्या आहेत.