सुळकूड: गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुधगंगा नदीची पाणी पातळी वाढली असून, अनेक पुलांवर पाणी आल्याने वाहतूक थांबवण्यात आली आहे. आता सुळकूड येथील जुन्या पुलावरही लवकरच पाणी येण्याची शक्यता आहे. मात्र, सुदैवाने येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलामुळे वाहतूक सुरळीत सुरू राहणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुधगंगा नदीवरील अनेक लहान पूल पाण्याखाली गेला आहे. अशा परिस्थितीत सुळकूड येथील जुना पूल पाण्याखाली गेल्यास पूर्वी मोठी गैरसोय होत असे.


परंतु, नवीन पुलाच्या बांधणीमुळे ही समस्या आता दूर झाली आहे. जुन्या पुलावर पाणी आले तरी नवीन पुलावरून वाहतूक सुरळीत सुरू राहणार असल्याने प्रवाशांना आणि स्थानिकांना दिलासा मिळाला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी तयार असल्याचे सांगितले आहे. पावसामुळे शेतीत काही ठिकाणी पाणी साचले असले तरी, धरणांमध्ये पाण्याची आवक वाढल्याने भविष्यातील पाणीटंचाईची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे.